Rahul Gandhi On Narendra Modi  Sarkarnama
देश

Rahul Gandhi On Modi : " मोदी म्हणजे पनौती, भारतीय टीम चांगलं खेळत होती पण..."; राहुल गांधींनी डिवचलं

Deepak Kulkarni

Jaipur News : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे 140 कोटी जनतेचे लक्ष लागलेले होते. पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका यांसारख्या तगड्या संघांना नमवून सलग दहा सामने जिंकत दिमाखदारपणे फायनलमध्ये भारताने एन्ट्री घेतली होती. त्यानंतर अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत वर्ल्ड कप उंचावणार असं स्वप्नं भारतीय बाळगून होते.

पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताला दारुण पराभव स्वीकारावा लागला. या पराभवावरूनच आता राजकारण तापलं असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोचक टोला लगावला आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. भाजपसह काँग्रेसकडूनही ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जालोर येथे एका सभेला संबोधित करताना त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. विश्वचषकातील अंतिम सामन्यातील भारताच्या पराभवाचं खापर राहुल यांनी मोदींवर फोडले आहे. राहुल यांचं भाषण सुरू होताच सभेला आलेल्या लोकांनी पनौती…पनौती अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.

त्यावर राहुल गांधी म्हणाले, बरं- वाईट काही का असेना, आपली टीम जिंकली असती, पण पनौतीने पराभूत केलं. टीव्हीवाले हे बोलणार नाहीत, पण जनतेला सर्व माहीत आहे, असा टोला त्यांनी मोदींना लगावला. या टीकेवरून पुन्हा एकदा भाजप-काँग्रेस यांच्यातील वाद पेटण्याची शक्यता आहे. भाजपकड़ून राहुल गांधींच्या या टिप्पणीवर आक्षेप घेण्यात आला असून, त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (Narendra Modi)

गांधी म्हणाले, पीएम मोदी म्हणजे पनौती मोदी आहेत. भारतीय टीम चांगलं खेळत होती, पण हे पनौती तिकडे गेले आणि आपल्या टीमला हरवलं, असेही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

...तर वर्ल्डकपपूर्वीच खेळाडूंना भेटायचं होतं!

मोदींना स्टेडियममध्ये पाहून आपले खेळाडू दबावाखाली आले. त्यामुळे आपण पराभूत झालो. कारण खेळाडू तणावाखाली होते. तेच पराभवाचं एकमेव कारण आहे. त्यांना खेळाडूंचं मनोबलच वाढवायचं होतं, तर वर्ल्डकपपूर्वीच खेळाडूंना भेटायचं होतं. अंतिम सामना पाहायला जाण्याची काहीच गरज नव्हती, असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय.(World Cup Final Match)

" त्या उद्योगपतींचे 14 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ..."

पंतप्रधान मोदी हे लोकांना भुलवतात. कधी इकडे नेतात तर कधी तिकडे नेतात. त्यांच्या धोरणांचा फायदा देशातल्या काही उद्योगपतींनाच झाल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. या वेळी त्यांनी गेल्या नऊ वर्षांच्या कालावधीत मोदींनी देशातल्या दहा ते पंधरा उद्योगपतींचे 14 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केलं. आता त्या उद्योगपतींमध्ये कोण गरीब होतं? कोण मागासलेलं होतं? असा हल्लाबोल त्यांनी आपल्या भाषणात केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT