CM Eknath Shinde and CM Yogi Adityanath Sarkarnama
देश

Maharashtra Sadan Ayodhya : मुख्यमंत्री शिंदेंचे स्वप्न होणार साकार; अयोध्येतील महाराष्ट्र सदन शरयू नदी किनारी उभारलं जाणार!

Mayur Ratnaparkhe

प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून अयोध्येस जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, आता अयोध्येत पोहचल्यानंतर त्यांना निवासासाठी इकडेतिकडे फिरावं लागणार नाही. अयोध्येत दोन एकर जागेवर महाराष्ट्र सदन उभारलं जाणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने महाराष्ट्र सदन निर्मितीसाठी महाराष्ट्र सरकारला दोन एक जागा देण्यास मंजूरी दिली आहे.

अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने उत्तर प्रदेश सरकारकडे मागणी केली होती. आता योगी आदित्यनाथ(Yogi Aadityanath) सरकारने महाराष्ट्र सरकारची ही मागणी मान्य केली आहे. मुख्यमंत्री योगी सरकारने महाराष्ट्र सरकारला शरयू नदी किनारी दोन एकर जमीन देण्याचा निर्णय केला आहे.

महाराष्ट्र सरकारमधील मंत्री रवींद्र चव्हाण(Ravindra Chavan) यांनी उत्तर प्रदेश सरकारचे आभार व्यक्त करत म्हटले की, त्यांनी उत्तर प्रदेश सरकारला अयोध्येत महाराष्ट्र सदन बनवण्यासाठी जागेची मागणी केली होती. या मागणीनंतर उत्तर प्रदेश सरकारने आम्हाला अयोध्येत दोन एकर जागा दिली आहे. ही जमीन महामार्गाशी लगत आहे आणि विमानतळाच्याही जवळ आहे. आता या जागेवर लवकरच महाराष्ट्र सदन बनवण्याचे कार्य सुरू केले आहे.

अयोध्येत 22 जानेवारी रोजी रामल्लाची प्राणप्रतिष्ठा आणि भव्य राम मंदिराचा उद्घाटन समारोह झाल्यापासून, या ठिकाणी सातत्याने विकास कामे मोठ्याप्रमाणावर सुरू आहेत. देशभरातून नव्हेतर जगभरातून या ठिकाणी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांच्या निवासाच्या दृष्टीने अनेक मोठे हॉटेल्सही उभारली जात आहेत. शिवाय अनेक राज्यांनी त्यांच्या नागिराकांसाठी सोयीच्या दृष्टीने निवासव्यस्था केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सदनही लवकरच उभारलं जाणार आहे.

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते. तेव्हा मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी अयोध्येत महाराष्ट्र भवनसाठी जागा देण्याची मागणी केली होती. त्याला योगी आदित्यनाथ यांनी राजभवनध्येच तत्वत: मान्यता दिली होती. तत्पूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना अयोध्या दौऱ्यात त्यांनी 8 मार्च 2020 रोजी अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा देण्याची मागणी केली होती. तेव्हा त्यांच्यासोबत एकनाथ शिंदेही होते.

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी फेब्रुवारी महिन्यात अंतरिम बजेट सादर केले. यावेळी त्यांनी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. यातील पहिली घोषणा होती ती अयोध्येतील महाराष्ट्र भवनची आणि दुसरी घोषणा होती ती जम्म-काश्मीरमधील महाराष्ट्र भवनची होती. या दोन्ही राज्यांत महाराष्ट्र सरकार भवन बांधणार असून त्यासाठी आर्थिक तरतुदींची घोषणा अजित पवारांनी केली. अजित पवारांनी ही घोषणा करताच सभागृहात 'जय श्रीराम' अशा घोषणा सुरू झाल्या. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा(Devendra Fadnavis) चेहरा फुलला होता.

महाराष्ट्रातील पर्यटक आणि भाविकांनी अयोध्या आणि श्रीनगरमध्ये सुविधा पुरवण्यासाठी महाराष्ट्र भवन (Maharashtra Bhavan) उभारले जाणार असून त्यासाठी 77 कोटींची तरतूद केल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले होते. राज्य सरकारने दोन्ही ठिकाणी मोक्याच्या जागा उपलब्ध करून घेतल्याचेही अजित पवारांनी सांगितले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT