Badri Ram Jakhar News
Badri Ram Jakhar News Sarkarnama
देश

Rajasthan Election : राजस्थानातील निवडणुकीवर सोलापुरातील ट्रक व्यावसायिकांचे लक्ष; माजी खासदार मैदानात

Amol Jaybhaye

आनंद सुरवसे

Rajasthan Assembly Election : देशभरात राजस्थानसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजस्थानच्या बाली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे उमेदवार आणि माजी खासदार बद्रीराम जाखड यांचा महाराष्ट्रातही दांडगा जनसंपर्क आहे. जाखड यांचा सोलापूरसह राज्यातील इतर काही जिल्ह्यात चौधरी ट्रान्सस्पोर्ट नावाने मोठा उद्योग व्यवसाय आहे. त्यामुळे काँग्रसेचे उमेदवार जाखड हे राजस्थान प्रमाणे महाराष्ट्रातही एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळखले जातात.

ट्रक व्यावसायिकांना कुतूहल

काँग्रेसचे नेते ब्रदीराम जाखड हे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. जाखड हे एक मुरब्बी राजकारणी आणि एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांचा राजस्थानसह देशातील विविध राज्यात हॉटेल आणि ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे. त्याच प्रमाणे त्यांचा महाराष्ट्रातील सोलापूर, धुळे या ठिकाणी ट्रान्सपोर्ट व्यवसाय विस्तारलेला आहे. तसेच ट्रक व्यवसाय निमित्त त्यांचा सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत जनसंपर्क आहे.

जाखड यांचे व्यक्तीमत्व हे सर्वसामान्य जनेतत सहजपणे मिसळून जाणारे आहे. त्यातच आता जाखड हे राजस्थानच्या बाली विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे सोलापूर शहर आणि परिसरातील ट्रक चालक-मालक संघटनांमध्ये या निवडणुकीबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. अनेकांचे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे.

तिकीट मिळाले, मतदारसंघ बदलला

जाखड यांनी यापूर्वी खासदार म्हणून पाली लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. दरम्यान, आता काँग्रेसने (Congress) त्यांना बाली विधानसभा मतदारसंघातून तिकीट देत या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरवले आहे. मात्र, जाखड यांनी जोधपूर जिल्ह्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. विशेषत: ओसिंया मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी जाखड जास्त इच्छुक होते.

मात्र, काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जाखड यांना बाली मतदारसंघातून संधी दिली आहे. तर ओसिंया मतदारसंघात विद्यमान आमदार दिव्या मदेरणा यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. मदेरणा आणि जाखड हे एकाच पक्षात असले तरी ते एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. त्याच जिल्हा परिषद निवडणुकीतून त्यांच्यामध्ये विरोध अधिकच तीव्र झाला आहे.

विजयी होण्याचा विश्वास

बाली विधानसभा मतदारसंघात भाजपचे (BJP) आमदार पुष्पेद्रसिंह रावत हे चार टर्म आमदार आहेत. आता यावेळी मुख्यमंत्री गेहलोत यांनी जाखड यांना बालीमधून मैदानात उतरवले आहे. बाली विधानसभा मतदारसंघ हा पाली लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे जाखड यांच्यासाठी येथील विजय सुकर होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

तसेच जाखड यांनी देखील यावेळी बालीमधून माझ्यासह पाली मतदारसंघातील इतर काँग्रेसचे उमेदवारही विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. आज पर्यंत काँग्रेसकडून तोडीचा उमेदवार न मिळाल्याने भाजपचा विजय होत होता. मात्र, यावेळी बालीमध्ये काँग्रेसचे विजयी होणार असल्याचेही जाखड म्हणाले. तसेच गेल्या पंच वार्षिक निवडणुकीमध्ये बाली मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT