Copy Of Constitution Dispute : Sarkarnama
देश

Copy Of Constitution Dispute : मोदी सरकारने खासदारांना भेट दिलेल्या राज्यघटनेच्या प्रतींमधून धर्मनिरपेक्ष-समाजवादी शब्द वगळले ?

Chetan Zadpe

New Delhi : राज्यघटनेच्या नव्या प्रतींच्या उद्देशिकेतून मोदी सरकारने धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द वगळल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांनी केला आहे. काँग्रेसनेही या मुद्द्यावरून आक्षेप नोंदवला आहे. या उद्देशिकेचे फोटोही विरोधकांनी ट्विट केले आहेत. मुळात घटनेतील उद्देशिकेत पहिल्या ओळीत भारताचं वर्णन हे सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी, प्रजासत्ताक असं करण्यात आलं आहे. मात्र, टीएमसीच्या दाव्यानुसार यातील दोन शब्द वगळण्यात आले आहेत. यावर आता मोठे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी दावा केला आहे की, 'नवीन संसद भवनात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना दिलेल्या राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये दोन शब्द वगळलेले आहेत. 'समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष' या दोन शब्दांना वगळण्यात आले आहे. चौधरी म्हणाले, 'संसदेत प्रस्तावना वाचताना हे दोन शब्द होते. मात्र, भेट दिलेल्या राज्यघटनांच्या प्रतींमध्ये या दोन शब्दांचा उल्लेख नाही. हे दोन्ही शब्द 1976 मध्ये घटनादुरुस्तीनंतर उद्देशिकेत जोडण्यात आले होते, परंतु दिलेल्या प्रतीमध्ये हे शब्द नसतील, तर ही चिंतेची बाब आहे."

केंद्रीय मंत्री काय म्हणाले ?

अधीर रंजन चौधरी यांच्या दाव्यावर केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल म्हणाले , "संविधानाची मूळ आणि सुधारित अशा दोन्ही प्रती देण्यात आल्या हाेत्या, असे स्पष्टीकरण मेघवाल यांनी दिली. यामुळे आता वादाला तोंड फुटले. काँग्रेस नेते म्हणाले, 'सरकारच्या हेतूंवर शंका आहे. त्यांनी हे काम अतिशय चलाखीने केले आहे. ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. हा मुद्दा सभागृहात मांडण्याचा प्रयत्न केला होता, पण संधी मिळाली नाही."

अधीर रंजन चौधरी म्हणाले, "मी राहुल गांधी यांच्याशी बोललो आणि त्यांना सांगितलं की, राज्यघटनेशी छेडछाड सुरू झाली आहे. जाणीवपूर्वक संविधानाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आम्हाला वाटते. राज्यघटनेच्या उद्देशिकेत आपल्यासाठी पाच गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक. तसेच न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही त्याची उद्दिष्टे आहेत. यात छेडछाड झाली तर देशाचा पाया कमकुवत होईल.

टीएमसीच्या खासदारांनीही प्रश्न उपस्थित केला

टीएमसीचे खासदार डोला सेन यांनीही केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले आणि त्यांना दिलेल्या राज्यघटनेच्या प्रतीमध्ये हे दोन्ही शब्द नाहीत, असे सांगितले.

(Edited by - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT