PM Modi, Uddhav Thackeray Sarkarnama
देश

Uddhav Thackeray : " मध्य प्रदेशात शिवराज सिंहाना बदललं तसं मोदींनाही..."; उद्धव ठाकरेंचं दिल्लीतून सूचक विधान

Deepak Kulkarni

Delhi News : पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर काहीशी बॅकफूटवर गेलेली काँग्रेसप्रणित 'इंडिया' आघाडी पुन्हा एकदा ट्रॅकवर येताना दिसून येत आहे. इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत होत आहे. आगामी लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच विरोधीपक्षांच्या 'इंडिया'आघाडीची दिल्लीत होत असलेल्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

या बैठकीच्या पार्श्वभूमीवरच माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील दिल्लीत दाखल झाले आहेत. पण इंडिया आघाडीच्या बैठकीआधीच त्यांनी नरेंद्र मोदींविषयी सूचक विधान करत खळबळ उडवून दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (ता.19) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी इंडिया आघाडीच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या रणनीतीवर भाष्य करतानाच मोदी शाहांवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, देशाची लोकशाही हाच आमचा स्वार्थ आहे. त्यांचं काय करायचं ते त्यांनी करावं. जसं मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांना बदललं गेलं. तसं नरेंद्र मोदींना पण बदलू शकतात.आज नाही तर उद्या जागावाटप करावंच लागेल. त्यासाठी मी अनेकांना भेटेन. थंडी वाजते म्हणून मी स्वेटर घातला आहे. पण हुडी,चष्मा घालून वगैरे कुणालाही भेटणार नाही असा अप्रत्यक्ष टोलाही ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला.

ठाकरे म्हणाले, बऱ्याच दिवसांनी मी दिल्लीला आलो आहे. इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे. आता निवडणुकीचं वर्ष सुरू होत आहे. त्यासाठी इंडिया आघाडीला रणनीती ठरवावी लागेल. आघाडीला कोणीतरी निमंत्रक असावा. त्यासाठी चेहरा ठरवता येतो का हेही पाहावे लागेल असंही उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

" आमच्या डोक्यात नेतृत्वाची हवा नाही..."

उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले. ते म्हणाले, पुढच्या वर्षी एप्रिल किंवा मेपासून निवडणुका होण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या बैठकीत आघाडीतील काही पक्षांच्या सूचना काय येतील त्यावर आमचे मत मांडणार आहोत. या बरोबरच आघाडीला समन्वयक ठरवता येतो का ? त्याचा विचार आज नाहीतर उद्या करावाच लागेल.(INDIA Alliance)

आम्ही एकत्र आलो असलो तरी आमच्या डोक्यात नेतृत्वाची हवा नाही. आघाडीत मतभेद असलेले लोक एकत्र आले आहेत. कोणाच्या मनात काय आहे, हे बघावं लागेल. आम्हाला देश वाचवायचा असून सध्याच्या काही घटना पाहून देशातील लोकशाही शेवटच्या घटका मोजत आहे का ? असा प्रश्न पडत आहे', असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT