Baramulla Voting  Sarkarnama
देश

Loksabha Election Voting : सहाव्या टप्प्यात पाच वाजेपर्यंत 57.7 टक्के मतदान; अनंतनाग-राजौरीत 'रेकॉर्ड ब्रेक'

Mayur Ratnaparkhe

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात शनिवारी सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 58 लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण 57.7 टक्के मतदानाची नोंद झाली. तर जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांनी आणि फुटरातावाद्यांनी ग्रासलेल्या अनंतनाग-राजौरी मतदारसंघात तब्बल 28 वर्षांचा मतदांनाचा विक्रम मोडीत निघत 52 टक्के मतदान झाले.

बंगालमधील आठ लोकसभा क्षेत्रातील काही भागांमध्ये छोट्या-मोठ्या हिंसक घटनांसह राज्यात सर्वाधिक 77.99 टक्के मतदान झाले. तर, दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी(Sonia Gandhi), काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. (Lok Sabha Elections Sixth Phase Voting)

लोकसभा निवडणुकीसाठी(Loksabha Election) सात टप्प्यात मतदान होणार आहे, आतापर्यंत 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 428 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. अंतिम टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे, तर मतमोजणी 4 जून रोजी होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जम्मू-काश्मीरच्या(Jammu and Kashmir) अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघात शनिवारी बंपर मतदान झाले. दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांचा प्रभाव असणाऱ्या क्षेत्रात वर्ष 1996चा मोडीत निघाला आणि जवळपास 52 टक्के मतदान झाले. मतदारांचा हा उत्साह वर्ष 2019मध्ये 9.7 टक्के झालेल्या मतदानापेक्षा जवळपास 42 टक्के जास्त आणि 1996मध्ये झालेल्या 50.20 टक्के मतदानापेक्षाही दोन टक्के जास्त आहे. विशेष म्हणजे मतदानादरम्यान कोणतीही दहशतवादी हल्ल्याची घटना घडली नाही.

पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्षा महबूबा मुफ्ती(Mehbooba Mufti) यांनी पोलिंग एजंटच्या अटकेवर संताप व्यक्त करत, जवळपास तीन तास बिजबिहाडा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले. त्यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांनी अनंतनागमध्ये काही मतदान केंद्रांवरील ईव्हीएमच्या मंद गतीचा मुद्दा उपस्थित केला होता. याआधी श्रीनगरमध्ये 39 टक्के आणि बारामुल्लामध्येही रेकॉर्डब्रेक 59 टक्के मतदान झाले होते.

बिहारमधील आठ जागांवर 55.45 टक्के मतदान झाले. झारखंडमध्ये चार जागांवर 54.34 टक्के मतदान झाले. याशिवाय हरियाणातील सर्व दहा जागांवर एकूण 46.26 टक्के, दिल्तील सात जागांवर 44.58 टक्के आणि उत्तर प्रदेशच्या 14 जागांवर सायंकाळी पाच वाजेपर्यंत 43.95 टक्के मतदान झाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT