Parliament, Narendra Modi Sarkarnama
देश

Narendra Modi In Central Hall : नरेंद्र मोदींनी घेतला नव्या भारताचा वेध; जगात टॉप राहण्यासाठी 'या' क्षेत्रांवर भर

Sunil Balasaheb Dhumal

Delhi News : नवीन संसदेत जाण्यापूर्वी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताच्या विकासाचा संकल्प केला. सर्व क्षेत्रात भारताला जगात अग्रक्रमांक प्राप्त होणार आहे. त्यासाठी सर्वांनी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून एकत्र येऊन एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. तसेच जुन्या संसद आणि सेंट्रल हॉलमधील घटनाक्रमांचाही त्यांनी भावुक होत आढावा घेतला. तसेच भारताच्या भविष्याचे चित्र कसे असणार, याचीही माहिती दिली. (Latest Political News)

सेंट्रल हॉल ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार

'या संसदेत, सेंट्रल हॉलमध्ये आपल्या भावना गुंतल्या आहेत. नव्या संसदेत काम करताना हे भवन आपल्याला कर्तव्य पार पाडण्यासाठी कायम प्रेरणा देत राहणार आहे,' असे सांगून मोदींनी सेंट्रल हॉलमधील ऐतिहासिक घटनांची माहिती दिली. ते म्हणाले, 'सेंट्रल हॉलमध्ये संविधानासाठी बैठका पार पडल्या. त्यात झालेल्या गहन चर्चांतूनच संविधानाने आकार घेतला. हा सेंट्रल हॉल १९४७ मध्ये ब्रिटिशांकडून देशाकडे सत्तेचे हस्तांतर झाले, त्याचेही साक्षीदार आहे. येथेच भारताच्या तिंरगा, राष्ट्रगीत स्वीकारण्यात आले. या सेंट्रल हॉलमध्ये अनेकदा दोन्ही सभागृहांतील सदस्यांनी देशाच्या विकासाचे निर्णय घेतले. १९५२ नंतर जगातील ४१ राष्ट्राध्यक्षांनी येथे मार्गदर्शन केलेले आहे, तर राष्ट्रपतींनी तब्बल ८६ वेळा सदस्यांना संबोधित केले,' अशी माहितीही मोदींनी सांगितली. (Maharashtra Political News)

चार हजारांहून अधिक कायदे

संसदेत आतापर्यंत चार हजारांहून अधिक कायदे तयार केल्याचेही मोदींनी सांगितले. वेळेनुसार संयुक्त सत्रात अनेक कायदेही पास केले. ते म्हणाले, 'तीन तलाकमधून सुटका करून मुस्लिम महिलांना न्याय देण्याचे कामही या भवनातून झाले. गत वर्षात ट्रान्सजेंडरांना न्याय देण्याचेही काम केले आहे. त्यांना हक्काचे शिक्षण आणि नोकरी देण्याचे निर्णयही घेण्यात येतील. गरिबांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठीही अनेक निर्णय घेतले. ३७० बाबत दरवर्षी चर्चा होत होती. गोंधळही होत होता, मात्र आमच्या कार्यकाळात ३७० कायदा केला. यामुळे दहशतवादाला आळा घालण्यास मदत झाली. देशाचे संविधान जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्याची संधी याच सदनामुळे मिळाली,' असेही मोदी म्हणाले.

भारताबाबत जगाला विश्वास

देशात एकापाठोपाठ एक झालेल्या घडामोडींवरून लक्षात येते की, भारत नवी चेताना घेऊन पुनर्जागृत झाला आहे. देशात नवी ऊर्जा आणि चेतना निर्माण झाली आहे. ही नवचेतना देशातील नागरिकांना संकल्प पूर्ण करण्यात मदत करणार आहे. देश ज्या दिशेने निघाला आहे, ही वाट आपल्याला इच्छित स्थळी घेऊन जाणार, यात वाद नाही. आता या आपल्याला गती वाढवण्याची गरज आहे. अर्थव्यवस्थेत भारत पाचव्या स्थानावर आहे. मात्र, आपल्याला लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहाेचायचे आहे. हे सांगताना आपल्यातील अनेकांची निराशा होईल, जग मात्र भारताच्या विकासाबाबत अस्वस्थ आहे. (Narendra Modi)

मोठा विचार करण्याची गरज

जगात मोठे स्थित्यंतर होत आहे, या लाटेवर स्वार होण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. गेल्या हजार वर्षांतील गुलामीमुळे आपला विश्वास गमावला होता. अनेक अडचणींमुळे आपण पिछाडीवर पडलो होतो. आता प्रथमच भारताची महत्त्वाकांक्षा उंचावर पोहाेचली आहे. आता भारत थांबण्याचे नाव घेत नाही. भारताचे भविष्य उज्वल करण्याचे काम सदस्यांचे आहे. संसदेतील प्रत्येक क्षण भारताचा विश्वास वाढवण्यासाठी केला पाहिजे. आपण विचार करण्याची क्षमता वाढवत नाही, तोपर्यंत भव्य भारताचे स्वप्न पाहू शकत नाही. पूर्वजांनी जे काही दिले त्याचे स्वीकार आहे. या वारसाला मोठ्या विचारांची जोड दिली तर येणाऱ्या पिढ्यांचे कल्याण करू शकतो.

तंत्रज्ञान भारत अग्रेसर

भारताला स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर बनवण्यासाठी काम केले पाहिजे. आपल्याबाबत जग आधी साशंक होते. आता जगभरात भारताच्या आत्मनिर्भरता मॉडेलची चर्चा होत आहे. देशाला उंचावर घेऊन जाण्यासाठी कुठलाही पक्ष, विचार आडवा येत नाही. मात्र, एकदिलाने देशाचा विकास करण्याची भावना हवी, असेही मोदी म्हणाले. सध्या भारत तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेत आहे. जगातील लोक तंत्रज्ञानाबाबत भारताच्या तरुणांकडे आशेने पाहत आहेत.

झिरो डिफेक्ट झिरो इफेक्टनुसार उत्पादन करण्याचे आहे. आपली विद्यापीठं जगात टॉपमध्ये आणायची आहेत. प्रत्येक खेळात युवकांना प्रवीण करून जगात तिरंगा फडकावयाचा आहे. प्रत्येक क्षेत्रात जगाला स्किल्ड मनुष्यबळ देण्याची क्षमता आपल्यात आहे. त्यासाठी पावले उचलेली आहेत. पर्यावरण वाचवण्यात देश आग्रेसर आहे. सेमिकंडक्टरची उत्पादनं करण्यावरही भर देण्यात येणार आहे. भावी पिढीला पाण्याच्या उपलब्धतेसाठी जलजीवन योजना राबवणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT