Punjab News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं'ऑपरेशन सिंदूर'राबवत पाकिस्तानला मोठे दणके दिले होते. भारताच्या तिन्ही सैन्य दलानं राबवलेल्या या जोरदार मोहिमेमुळे पाकचे अक्षरश:कंबरडे मोडले होते. पण या देशभरातही केंद्र सरकारने उचलेलं ठोस पाऊल आणि लष्कराच्या कारवाईचं कौतुक सुरू होतं. पण अचानक अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आले.
मात्र, यानंतर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले सुरुच असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे देशभरात तीव्र असंतोषाची लाट उसळली आहे. याचदरम्यान,आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आदमपूर एअरबेसवरुन कुरापती पाकिस्तानला कडक इशारा देत 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठे संकेत दिले आहेत.
पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी मंगळवारी (ता.13)पंजाबमधील आदमपूर एअरबेसला भेट दिली.यावेळी त्यांनी पायलट,इतर अधिकारी,जवानांशी संवाद साधला. भारतानं पाकिस्तानविरोधात राबवलेल्या'ऑपरेशन सिंदूर'मध्ये हवाई दलाची सर्वात मोलाची भूमिका ठरली होती. त्याचमुळे मोदींनी हवाई दलाचा एअरबेस गाठला. यावेळी पंतप्रधानांनी हवाई दलासह संपूर्ण लष्करावर कौतुकाचा वर्षाव केला.
भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीचा निर्णय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'ऑपरेशन सिंदूर'बाबत (Operation Sindoor) मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, पाकिस्तानला दहशतवाद थांबवला नाही तर पुन्हा हल्ला करण्याचा सूचक इशारा दिला आहे. तसेच ऑपरेशन सिंदूर ही सामान्य सैन्य मोहीम नसून ही भारताची नीती,नियत आणि निर्णायक क्षमतेची त्रिवेणी आहे. भारत ही बुद्धांची भूमी आहे,तसेच ती गुरु गोविंद सिंह यांची देखील भूमी आहे, भारताकडे डोळे वटारुन बघाल तर खात्माच होईल असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
मोदी म्हणाले, भारतीय सैन्यानं पाकिस्तानी सैन्याला धूळ चारली.तुम्ही पुढच्या पिढीसाठी प्रेरणा बनला असल्याचं सांगत त्यांनी वीरांच्या या भूमीवरून नेव्ही,आर्म फोर्स आणि हवाई दलाच्या सर्व जवानांना सॅल्यूट करत असल्याची भावनाही व्यक्त केली. तसेच तुमच्या पराक्रमामुळे आज ऑपरेशन सिंदूरचा आवाज प्रत्येक कानाकोपऱ्यात घुमत आहे. या मोहिमेदरम्यान, प्रत्येक भारतीय तुमच्यासोबत होता. तसेच संपूर्ण भारतीयांची प्रार्थना तुमच्यासोबत होती.त्याचमुळे आजही प्रत्येक नागरिक आपल्या सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाप्रती कृतज्ञ आणि ऋणी असल्याचा विचारही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
तसेच परत जर पहलगामसारखी आगळीक केली तर घरात घुसून मारू आणि एकसुध्दा संधी दिली जाणार नाही,असा दमही पाकिस्तानला भरला. हा नवीन भारत आहे, पाकिस्तानची अणुहल्ल्याची धमकी कदापि सहन करणार नाही हे सांगतानाच त्यांनी मानवतेवर हल्ला झाला तर दहशतवाद्यांना मातीत गाडणं आपल्याला माहिती असल्याचं ठणकावत प्रत्यक्ष ऑपरेशन सिंदूर हे तात्पुरतं स्थगित केल्याचं दाखवून दिले. तसेच भविष्यात पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरबाबतचे मोठे संकेतही दिले.
जर पुन्हा दहशतवादी हल्ला झाला तर त्याला भारत आपल्या अटी आणि शर्थींवर जशास तसं प्रत्त्युतर देईल. त्यावेळी पाक लष्कर आणि दहशतवादी यांना वेगळे मानणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ऑपरेशन सिंदूरने तुम्ही आत्मबल वाढवलं. देशाला एकतेच्या सूत्रात बांधलं आहे. तुम्ही भारताच्या सीमेचं संरक्षण केलं आहे. देशाच्या स्वाभिमानाला नव्या उंचीवर आणलं असून तुम्ही जे केलं,जे अभूतपूर्व,अकल्पनीय,अद्भूत असल्याच्या भावना जवानांशी संवाद साधताना व्यक्त केल्या.
याचवेळी त्यांनी हवाई दलाने पाकिस्तानमध्ये इतक्या डीप दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना टार्गेट केलं. सीमेपलिकडे पीन पॉइंटेड टार्गेट फिक्स केलं.हे फक्त प्रोफेशनल फौजच करू शकते. तुमची स्पीड अत्यंत वेगात होती की, दुश्मन बघतच राहिला. त्याला कळलंच नाही,त्याच्या छातीच्या कधी चिंधड्या उडाल्या,असे गौरवोद्गारही त्यांनी भारतीय लष्कराविषयी काढले.
पाकिस्तानकडून पंजाबमधील आदमपूर येथील हवाई दलाचं एअरबेस उध्वस्त केल्याचा खोटा दावा करण्यात आला होता. मात्र, भारतीय हवाईदलाने यापूर्वीच पाकचा दावा खोडून काढला होता. आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच मंगळवारी आदमपूर गाठत भारतीय सैन्याचं मनोबल वाढवल्याचं दिसून आलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.