Rahul Gandhi - Amit Shah  Sarkarnama
देश

Rahul Gandhi News : अमित शाहांचा मुलगा काय करतो?, 'घराणेशाही'वरून राहुल गांधींनी भाजपला खिंडीतच गाठलं

Digvijay Jirage

Mizoram News : काँग्रेसवर भाजपकडून नेहमी घराणेशाहीच्या मुद्द्यावर टीका होत असते. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून काँग्रेससह विरोधी पक्षांवर टीकेचे घाव घालताना नेहमीच घराणेशाहीवर बोट ठेवले जाते. आता काँग्रेससह इतर पक्षांवर नेहमी घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपवर खासदार राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.

खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी मंगळवारी मीडियाशी संवाद साधला. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा मुलगा काय करतो? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मुलगा काय करतो? असा सवाल करत भाजपवर टीकेची झोड उठवली.

मिझोराममध्ये येत्या ७ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणूक प्रचारासाठी ते आयझोल येथे आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपकडून सातत्याने होणाऱ्या घराणेशाहीच्या आरोपावर उत्तर दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल गांधी म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे अमित शाह(Amit Shah) यांचा मुलगा भारतीय क्रिकेट संघटना चालवतो. त्यांच्या नेत्यांची मुले काय करतात, याकडे भाजपने आधी पाहिले पाहिजे. अनुराग ठाकूर यांच्याशिवाय इतरही लोक आहेत, जे राजकारणातील घराणेशाहीचे उदाहरण आहेत.

भाजपकडून काँग्रेसवर नेहमी घराणेशाहीचा आरोप केला जातो, असा प्रश्न पत्रकारांनी राहुल गांधी यांना विचारला होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी भाजपमधील नेत्यांची आणि त्यांच्या राजकारणात सक्रिय असलेल्या मुलांची नावे सांगत हल्लाबोल केला.

" आमच्या दृष्टीने भारत हा राज्यांचा एक संघ..."

'आमच्या दृष्टीने भारत हा राज्यांचा एक संघ आहे. सर्व धर्म, संस्कृती आणि सर्वांचा इतिहास वाचवण्याची गरज आहे. काँग्रेसने नेहमी भारताची स्वतःची वेगळी ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, भाजपच्या(BJP) दृष्टीने भारताची व्याख्या वेगळी आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ईशान्य भारतातील अनेक राज्यांवर हल्ले करत आहे. आपली धार्मिक व्यवस्था, भाषा या सर्वांवर आरएसएसचे विचार हल्ले करत आहेत. त्यांना भारतात केवळ एक पक्ष आणि एक विचारधारेची सत्ता असली पाहिजे, असेही गांधी या वेळी म्हणाले.

राहल गांधी यांनी या वेळी इस्राईल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धावरही भाष्य केले. काँग्रेस नेहमीच हिंसेच्या विरोधात आहे. निर्दोष नागरिकांविरोधातील कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे आम्ही समर्थन करत नाही. नागरिकांची हत्या करणे गुन्हा आहे.

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणासह मिझोरामचाही समावेश आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT