Rahul gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi Manipur Tour : राहुल गांधींचा ताफा मणिपूरमध्ये पोलिसांनी रोखला; आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांकडून तोडफोड, गांधी इंफाळकडे रवाना

सरकारनामा ब्यूरो

Manipur News : मणिपूर दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना गुरुवारी (ता. २९ जून) बिष्णुपूर जिल्ह्यात रोखण्यात आले आहे. राहुल गांधी हे मदत छावण्यांना भेट देण्यासाठी चुराचांदपूरला जात होते. मात्र, पोलिसांनी त्यांचा ताफा अगोदर वाटेत अडवला आहे. त्यामुळे संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी मात्र गोंधळ घालून बॅरिकेड्‌स तोडण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना आश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. (Rahul Gandhi's convoy was stopped by the police in Manipur)

गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये (Manipur) हिंसाचार उफाळला आहे. मंत्री आणि आमदारांच्या घरांना आगी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष मणिपूरकडे लागलेले आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विषयावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) हे मणिपूरच्या दौऱ्यावर गेले आहेत.

राहुल गांधी यांचा ताफा इंफाळच्या आधी सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या बिष्णुपूर जिल्ह्यात थांबविण्यात आला आहे. परिसरातील हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना पाहता पोलिस त्यांना पुढचा दौरा करण्यास परवानगी नाकारला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना अखेर इंफाळला परतले आहेत.

दरम्यान, मदत छावण्यांना भेट देण्यास राहुल गांधी यांना पोलिसांनी परवानगी नाकारल्याने काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्यांनी घटनास्थळी गोंधळ घातला असून पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्‌सही तोडण्याचे प्रयत्न कार्यकर्त्यांनी केले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या आहेत.

काँग्रेसकडून गंभीर आरोप

याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, राहुल गांधींचा ताफा पोलिसांनी बिष्णुपूरजवळ रोखला आहे. पुढे जाण्यासाठी पोलिस आम्हाला परवानगी देण्याच्या मनस्थितीत नाहीत. राहुल गांधींना भेटण्यासाठी लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे आहेत, त्यामुळे पोलिसांनी आम्हाला रोखले, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. राहुल गांधींचा हा दौरा पीडित लोकांना भेटण्यासाठी आहे. आम्ही जवळपास २० ते २५ किलोमीटर प्रवास केला, पण कुठेही रस्ता अडवला नाही. राहुल गांधी कारमध्ये बसले आहेत. स्थानिक पोलिसांना कोणी सूचना दिल्या हे मला माहीत नाही.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट केले की, पंतप्रधान कदाचित गप्प राहणे पसंत करू शकतात, परंतु मणिपुरी समाजातील सर्व घटकांचे ऐकून त्यांना मदत करण्याचे राहुल गांधी यांचे प्रयत्न का थांबवले जात आहेत?

हिंसाचाराची भीती

यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, हिंसाचाराच्या भीतीने राहुल गांधी यांचा ताफा रोखण्यात आलेला आहे. बिष्णुपूर जिल्ह्यातील उटलू गावाजवळ महामार्गावर टायर जाळण्यात आले आणि काही ठिकाणी दगडफेकही करण्यात आली. अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही ताफ्याला बिष्णुपूर येथे थांबण्याची विनंती केली आहे.

राहुल गांधी यांचा कार्यक्रम

राहुल गांधी आज आणि उद्या म्हणजेच २९ ते ३० जून रोजी मणिपूरमध्ये असतील. यादरम्यान ते मदत छावण्यांना भेट देणार आहेत. ते इंफाळ आणि चुराचांदपूर येथील नागरिकांशी संवाद साधतील, ते मदत छावण्यांनाही भेट देणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT