Shivsena Leader Sanjay Raut News
Shivsena Leader Sanjay Raut News Sarkarnama
देश

शिवसेना म्हणजे युक्रेन नाही : राऊतांनी सांगितले भाजपने मुख्यमंत्रीपद का सोडले

सरकारनामा ब्युरो

दिल्ली - राज्यातील विधानसभेत आज शिंदे गट व भाजप यांना विश्वासमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी भाजपचे व शिंदे गटाचे आमदार ताज हॉटेलमधून विधानसभेच्या दिशेने निघाले आहेत. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गट व भाजपवर जोरदार टीका केली. तसेच भाजपने शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद का दिले यावर त्यांचे मत मांडले.

संजय राऊत म्हणाले, देशात ज्याच्या हाती सत्ता तो पारधी अशी स्थिती निर्माण झाली आहे. पिठासीन अधिकारी हा त्याच्या पक्षासाठी निर्णय घेऊ लागला आहे. शरद यादव यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्या म्हणून वैकय्या नायडू यांनी त्याचे पद काढून घेतले होते. तोच न्याय शिवसेना बंडखोरांच्या बाबत लागू होतो. मात्र सोयी प्रमाणे न्याय अशी स्थिती आहे. याला संसदीय लोकशाही म्हणत नाही. सध्या महाराष्ट्रात तेच सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, नरहरी झिरवळ यांनी विधानसभेत शिवसेना आमदारांनी पक्षाच्या आदेशा विरोधात मतदान केल्याचा निर्णय दिला होता. तो निर्णय विधानसभेचे नूतन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बदलला. मूळ पक्ष शिवसेना आहे. शिवसेनेने तिकीटे देऊन निवडून आणल्यावर आमदारांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. त्यांनी मनाला विचारावे तुम्ही खरेच शिवसेनेचे आमदार राहिले आहात का?, असा प्रश्नही त्यांनी बंडखोरांना विचारला.

बंडखोर आमदारांविषयीचा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. अशा स्थितीत विधानसभा अध्यक्ष निवड व बहुमत सिद्ध करायला लावणे बेकायदेशीर आहे. शिवसेना म्हणजे युक्रेन नाही. शिवसेना ताब्यात घेता येऊ शकत नाही. काही लोक सोडून गेले म्हणजे शिवसेना कमजोर झाली नाही. हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा अपमान आहे. हा अपमान सामान्य शिवसैनिक सहन करणार नाही. विधानसभेत ईडी नावाचा गजर झाला तो उगाच नाही. शिवसैनिक जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत दिल्लीचे मनसुबे पुरे होणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.

भाजपला महाराष्ट्राचे मुंबई सह तीन तुकडे करायचे आहेत. मुंबईतील धनशक्तीवर सत्ता मिळवायची आहे. शिवसेनेचे तुकडे झाल्याशिवाय ते शक्य नाही. म्हणून त्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले. त्यांनी शिवसेनेचे केलेले तुकडे हे कागदावरील आहेत. खरी शिवसेना शहर, ग्रामीण भागातील सर्वसामान्य शिवसैनिकांत आहे. हे शिवसैनिक भाजप बरोबर गेलेले नाहीत. शिवसेना जमिनीवर अजूनही एकत्र आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कसाबपेक्षा जास्त सुरक्षा

भाजपने शिवसेनेचे आमदार फोडून त्यांना केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या कडेकोट सुरक्षेत विधानसभेत आणले. या आमदारांना कसाबपेक्षाही जास्त सुरक्षा देण्यात आली. शिवसेनेचे हे वाघ, बछडे काही दिवसांपूर्वी छाती बाहेर काढून सन्मानाने फिरत होते. मात्र आता त्यांना सुरक्षेत आणावे लागते. त्यांच्या माना खाली आहेत. त्यांना सुरक्षा का घ्यावी लागली? भाजपला फक्त शिवसेना फोडायची होती. फुटीरवादी गटाला त्यांनी पुढे केले, असा आरोप त्यांनी केला.

तर महाविकास आघाडी का झाली असती

2019च्या निवडणुकीनंतर भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले असते तर महाविकास आघाडी का स्थापन करावी लागली असती. त्यांना शब्द पाळायचा नव्हता. कारण त्यांना शिवसेना व मुंबई तोडायची आहे. जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपचा अजेंडा

उदयपूरमध्ये घडलेल्या घटनेत भाजपचेच लोक असल्याचे समोर आले आहे. दोन धर्मांत द्वेष निर्माण करून निवडणुका जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT