Justin Trudeau-Narendra Modi Sarkarnama
देश

India Vs Canada Dispute: भारत-कॅनडा संबंधातील दरी वाढली; हा ठरला कळीचा मुद्दा

Vijaykumar Dudhale

New Delhi : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत. दोन्ही देशांदरम्यान कोणतीही चर्चा होत नसल्याने मुक्त व्यापार कराराबाबत (FTA) वाटाघाटी सध्या थांबल्या आहेत. कॅनडातील घडामोडींवर भारताने नाराजी व्यक्त केली असून, जोपर्यंत राजकीय प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत चर्चा होणार नसल्याचे भारताने स्पष्ट केल्याने पेच वाढला आहे. दोन्ही देशांमधील मतभेदांचे कारण हा खलिस्तानचा मुद्दा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याचा उल्लेख न करता राजकीय समस्यांचे निराकरण झाल्यानंतर पुन्हा चर्चा सुरू केली जाईल, या वृत्ताला एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. (The gap in India-Canada relations widened; This was the key point)

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या खुनाचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुड्यू यांनी भारतावर लावला आहे. तेव्हापासून दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. कॅनडाने भारतीय राजदूताची हकालपट्टी करताच भारतानेही जशास तसे उत्तर दिले आहे. त्यातून दोन्ही देशांतील दरी वाढत चालली आहे.

खलिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतीय वंशाच्या लोकांवर हल्ले केले होते. मात्र, कॅनडाकडून या खलिस्तानी दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये बाधा निर्माण होत आहे. कॅनडाने येत्या काळात खलिस्तानी दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी. कॅनडाकडून या खलिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया जोपर्यंत थांबविल्या जात नाहीत आणि खलिस्तानी दहशतवाद संपविण्यासाठी मुळापासून कारवाई केली जात नाही, तोपर्यंत भारत आपल्या भूमिकेवरून हटणार नाही, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

खलिस्तानवाद्यांवर कॅनडात कारवाई केली जात नाही, असा आरोप भारताकडून केला जातो. ट्रुड्यू पंतप्रधान झाल्यापासून भारताचे कॅनडाशी असलेले संबंध आणखी ताणले गेले आहेत. नुकतेच दिल्लीत पार पडलेल्या जी-२० परिषदेतही त्याचे पडसाद उमटले. जी-२० परिषदेत भारताने कॅनडात सुरू असलेल्या भारतविरोधी कारवायांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. या आधी फेब्रुवारी २०१८ मध्येही भारत-कॅनडा या देशांत खलिस्तान समर्थकांच्या मुद्द्यावरून वाद झाला होता. तेव्हा जस्टिन ट्रुड्यू हे साधारण एका आठवड्यासाठी भारताच्या दौऱ्यावर होते.

जोपर्यंत कॅनडा आपल्या भूमीतून भारतविरोधी कारवाया थांबवत नाही, तोपर्यंत त्याच्याशी मुक्त व्यापार करारावर चर्चा केली जाणार नाही, अशी भूमिका भारताने घेतली आहे. सुमारे दशकभरानंतर दोन्ही देशांमध्ये एफटीएवर चर्चा सुरू होणार होती. मात्र, भारताकडून हे विधान आल्यानंतर कॅनडाने पुढील महिन्यात भारतभेटीत होणारे करार तूर्तास स्थगित केले आहेत.

कॅनडाच्या व्यापार मंत्री मेरी एनजी या ऑक्टोबरमध्ये व्यापार मोहिमेसाठी भारताला भेट देणार होत्या. या मोहिमेदरम्यान दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करारावर बोलणी होणार होती. मात्र, ही भेट तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. ही चर्चा ऑक्टोबरमध्ये होणार होती. मेरीच्या प्रवक्त्या कोसेंटिनो यांनी सांगितले की, सध्या आम्ही भारतासोबत होणारे करार पुढे ढकलत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काळात दोन्ही देशांदरम्यानची दरी कमी होण्याऐवजी वाढत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT