Eknath Shinde_TMC Split 
देश

Eknath Shinde : 'तृणमुल'च्या फुटीचं एकनाथ शिंदेंना टेन्शन? गणित बिघडलं, बार्गेनिंग पॉवर होणार कमी; जाणून घ्या सविस्तर

TMC Impact on Eknath Shinde : जर तृणमूल काँग्रेसच्या २० बंडखोर खासदारांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पाठिंबा जाहीर केला तर संसदेत भाजपची स्थिती आणखी मजबूत होणार आहे.

Amit Ujagare

TMC Impact on Eknath Shinde : पश्चिम बंगालच्या राजकारणाचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील पडणार आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये झालेल्या भूकंपाचा धक्का एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचला आहे. कारण अशी चर्चा समोर येत आहे की, तृणमूल काँग्रेसचे २० बंडखोर खासदार भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पाठिंबा जाहीर करणार आहेत. यासंदर्भातील एक पत्र देखील समोर आलं आहे. जर हे सत्यात उतरलं तर संसदेत भाजपची स्थिती आणखी मजबूत होणार आहे. त्यामुळं सहाजिकच एकनाथ शिंदेंची केंद्रातील बार्गेनिंग पॉवर कमी होणार आहे.

नेमकं गणित कसं आहे?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळू शकलं नाही. २०१४ पेक्षाही भाजपची या निवडणुकीत वाईट अवस्था झाली. पण एनडीएतील मित्रपक्षांच्या साथीमुळं भाजपला सत्ता कायम राखता आली. यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ७ खासदार निवडून आले होते. यामुळं शिंदेसेना एनडीएतील सर्वाधिक खासदारांचा चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. त्यांच्यापुढे भाजप-२४०, टीडीपी-१६, जेडीयू-१२ हे पक्ष आहेत. या तीन पक्षांचं मिळून संख्याबळ २६८ इतकं होतं. पण केंद्रात सत्ता स्थापन करायला २७२ इतकं बहुमत लागतं. त्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेच्या ७ खासदारांना सोबत घेतल्याशिवाय भाजपला सरकार स्थापन करता येत नव्हतं. म्हणूनच एकनाथ शिंदे यांचा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीपर्यंत आवाज ऐकला जात होता, त्यांची बार्गेनिंग पॉवर चांगलीच वाढली होती.

महाराष्ट्रातील राजकारणाचं चित्र बदललं

दरम्यान, २०२४ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत चित्र बदललं होतं. भाजपनं १३२ जागा जिंकल्या तर शिवसेनेला ५७ जागा मिळाल्या. भाजपला पहिल्यांदाच राज्यात सर्वाधिक जागा मिळालेल्या असल्यानं सहाजिकच आधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे या नव्या सरकारमध्ये त्यापदावरुन दूर झाले आणि उपमुख्यमंत्री बनले तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले, त्यामुळं राज्यातील राजकारणाचं शक्तीकेंद्र बदललं. भाजप आता बहुमतासाठी शिंदेंच्या शिवसेनेवर अवलंबून असली तरी नंतर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत आल्यानं शिंदेंची पॉवर कमी झाली होती. पण केंद्रातील मोदी सरकारला शिंदेंची अत्यंतिक गरज असल्यानं महाराष्ट्रातही शिंदेंच्या शिवसेनेचा प्रभाव कायम होता. त्यामुळं अनेकदा आपल्या मनासारख्या गोष्टी झाल्या नाहीत तर एकनाथ शिंदे अचानक आपल्या सातऱ्यातील दरे गावी जायचे. हा त्यांचा सिलिसिला अद्यापही कायम आहेच, पण आता त्यांना यावर आवर घालावाच लागेल.

तृणमूलच्या फुटीचा नेमका काय होणार परिणाम

जर तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी एनडीएला पाठिंबा दिला तर संसदेत भाजपची स्थिती आणखी मजबूत होणार आहे. अनेक महत्वपूर्ण विधेयकांना मंजुरीसाठी भाजपला आपल्या काही निवडक सहकारी पक्षांवरच अवलंबून रहावं लागत होतं, ते यामुळं होणार नाही. त्यामुळं अर्थातच एकनाथ शिंदे यांची राजकीय उपयोगिता आणि बार्गेनिंग पॉवरला फटका बसणार आहे. एकनाथ शिंदेंचं २०२२ मध्ये झालेलं बंड आणि आता तृणमूल काँग्रेसमध्ये झालेलं बंड यांचा एक विचित्र योगायोगही पाहायला मिळतो आहे. कारण जेव्हा शिंदेंनी बंडखोरी केली आणि त्यांच्या म्हणण्यानुसार महाशक्तीच्या आशीर्वादामुळं शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह हे दोन्हीही त्यांनाच मिळालं, त्यामुळं ते एक राजकारणी म्हणून मजबूत बनले होते. अनेक विश्लेषकांनी या घटनेला राजकारणातलं 'महाराष्ट्र मॉडेल' असंही संबोधलं. यानंतर आता काहीशी अशीच स्थिती पश्चिम बंगालमध्ये निर्माण झाली आहे. बंडखोरीमुळं एका प्रादेशिक पक्षाची ताकद कमी झाली आहे, त्यामुळं त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा शिंदेंच्या राजकारणावरच पडणार आहे. यामुळं खरंतर एक वर्तुळ पूर्ण झालं आहे.

शिंदेंचं महत्व कमी होतंय

महायुती सरकारमध्ये भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसही असल्यानं शिवसेनेचं महत्व आपोआपच काहीसं कमी झालं आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा बेरकी राजकारणी व्यक्तीकडं सत्तेचं केंद्र असल्यानं ते शिवसेनेला वरचढ होऊ देत नाहीएत. नुकत्याच राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपनं शिवसेनेला अनेक ठिकाणी शह दिला होता. नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरुनही महायुतीतील तिन्ही पक्षात वाद झाला होता. त्यामुळं इथलं पालकमंत्रीपद अद्यापही रिक्तच आहे. याशिवाय कॅबिनेटचा विस्तार, महामंडळांच्या नियुक्त्या आणि निधी वाटपावरुनही भाजप आणि शिवसेनेत अनेकदा मतभेद पाहायला मिळाले.

दरम्यान, राज्यात जर मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत तर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चा करत नसत तर ते थेट दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेत होते. अशा प्रकारे अनेकदा एकनाथ शिंदेंनी दिल्ली वाऱ्या केल्या आहेत. तिथं केंद्रातील स्थिती आणि राज्यातील गरज पाहुन मग शहांकडून तडजोडी घडवून आणल्या जात होत्या. यावरुनच फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये सर्वकाही आलबेल आहे असंही ठामपणे म्हणता येत नाही. पण तरीही भाजपसोबत राहण्याशिवाय सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडं दुसरा पर्यायही उपलब्ध राहिलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT