Trinamool Congress political crisis 2026: तृणमूल काँग्रेस हा पक्ष सध्या विचित्र कोंडीत सापडला आहे, एकामागू एक खासदार राजीनामा देत आहेत. त्यामुळं ममता बॅनर्जी दिवसेंदिवस एकट्या पडत असल्याचं चित्र आहे.
काल बंडखोरांच्या यादीत सायनी घोष यांचा समावेश असल्याचं समोर आलं. ज्या सायनी घोष या संसदेत आपल्या खास अंदाजात भाजपवर तुटून पडत होत्या, आज त्याच भाजपसोबत जाण्यासाठी निघाल्या आहेत. त्याचबरोबर आज आणखी एका खासदारानं ममतांची साथ सोडली असून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
तृणमूलमध्ये बंडखोरी झाल्यानंतर आजवर तीन खासदारांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. हे तिघेही राज्यसभेचे खासदार आहेत, यांपैकी आठवडाभरापूर्वी सुखेंदू शेखर रॉय यांनी राजीनामा दिला होता. सुखेंदू हे तृणमूल काँग्रेसचे जुने आणि विश्वासू नेते होते. पक्षांतर्गत नाराजीमुळं त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे.
पक्षात केवळ ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांचंच ऐकलं जातं, पक्षात केवळ एकेरी वाहतूक सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार अन् आरजी कार प्रकरणात अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोपही करताना याबाबींमुळं नाराज असल्याचं म्हटलं होतं.
तर सुष्मिता देव यांनी कालच तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभा खासदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. सुष्मिता देव या देखील ममता बॅनर्जींच्या जवळच्या सहकारी मानल्या जात होत्या. कारण देव यापूर्वी काँग्रेसच्या लोकसभा खासदार होत्या. आसाममधल्या सिलचर मतदारसंघातून त्या निवडून आल्या होत्या.
पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अल्पावधितच त्या ममतांच्या जवळच्या सहकारी बनल्या आणि ममतांनी त्यांना पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्त केलं आणि राज्यसभेची खासदारकीही दिली.
पण काल राजीनाम्यानंतर त्यांनी दिल्लीत असलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांची भेट घेतली. यानंतर त्यांना आसाममधील एका लोकसभा पोटनिवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. आपल्याला आता आपल्या राज्यातील (आसाम) राजकारणावर लक्ष केंद्रीत करायचं असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
यानंतर आता तृणमूलचे राज्यसभेचे तिसरे खासदार प्रकाश चिक बराइक यांनी खासदारकीची राजीनामा दिला आहे. यानंतर आता ते राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांना आपला राजीनामा देणार आहेत.
पण राजीनामा देण्यामागचं कारण जरी त्यांनी स्पष्ट केलेलं नसलं तरी, सध्या तृणमूलचं भविष्य या लोकांना काही चमकदार दिसत नसावं, म्हणूनच त्यांना आपल्या भविष्याची चिंता लागली असल्यानं एकामागून एका खासदारानं आपला वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतलेला दिसतो आहे.
तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेत एकूण ११ खासदार आहेत. यांपैकी आता तीन जणांनी राजीनामा दिल्यानं ही संख्या ८ इतकी राहिली आहे. या उर्वरित ८ खासदारांमध्ये डेरेक ओब्रायन, सागरिका घोष, मोहम्मद नदीमुल हक, डोला सेन, ममता बाला ठाकूर, समीरुल इस्लाम, राजीव कुमार, मेनका गुरुस्वामी, कोयल मल्लिक या खासदारांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.