Uddhav Thackeray eknath shinde amit shah  Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena Politics: 'मातोश्री'ला हादरवणाऱ्या राजकीय भूकंपाची 'स्क्रिप्ट' एकनाथ शिंदेंनीच नव्हे, तर 'या' तीन नेत्यांनी लिहिली; ठाकरेंचा अखेरचा प्रयत्नही फसला

Shivsena Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षात उभी फूट पडली आहे. गेल्या 24 तासांपासून राज्यासह दिल्लीच्या राजकारणात अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या आहेत.

Deepak Kulkarni

New Delhi News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून ज्याची भीती होती,तेच मंगळवारी(ता.16) रात्री घडलं. ठाकरेंचा पक्ष चार वर्षांनंतर पुन्हा एकदा फुटला आहे. महाराष्ट्रासह दिल्लीत 24 तासांच्या आतच मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या.उद्धव ठाकरेंची साथ सोडत सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी पावलं उचलली आहे. परंतू, ठाकरेंसह मातोश्रीला हादरवणाऱ्या राजकीय भूकंपाची स्क्रिप्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच लिहिल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पण ठाकरेंचा पक्ष फोडण्यात शिंदेंसह तीन प्रमुख नेत्यांनी महत्त्वाची भूमिका निभावल्याची चर्चा आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ज्याची भीती होती, ते प्रत्यक्षात घडले आहे. सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' करत अखेर दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेत आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचं पत्र दिल्याची माहिती समोर येत आहे. पण या एवढ्या वेगवान घडामोडींमागची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झालं आहे. मंगळवारी (ता.16) रात्रीपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे फुटलेले खासदार एक-एक करुन दिल्लीत दाखल होण्यास सुरुवात झाली. त्याचदरम्यान,दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही तातडीनं मध्यरात्री दिल्ली गाठली.

शिवसेना 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा राजकीय भूकंपानं हादरली. पण केंद्रीय राज्यमंत्री व शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातील 'डिनर डिप्लोमसी' ते 'ऑपरेशन टायगर' पर्यंतच्या प्रवासाची धक्कादायक इनसाईड स्टोरी समोर आली आहे. खरंतर, बंडखोरीची कुणकुण लागताच उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आपल्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती.पण या बैठकीला मोजकेच चार खासदार उपस्थित राहिले होते. बाकीचे खासदार अनुपस्थित राहिले,तर कुणी ऑनलाईन हजेरी लावली होती.तेव्हाच पक्ष फुटणार हे निश्चित मानले गेले होते. मात्र, या बैठकीच्या माध्यमातून ठाकरेंनी खासदारांची बंडखोरी टाळण्यासाठी केलेला अखेरचा प्रयत्नही फसला.

देशाची राजधानी दिल्लीत एनडीए घटकपक्षांची दिल्लीत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला एकनाथ शिंदे हजर होते. या बैठकीमध्ये अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात ऑपरेशन टायगर संदर्भात चर्चा झाली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींची संमती आवश्यक होती.

अमित शाह यांनी अखेर नरेंद्र मोदी यांनाच फोन फिरवला. त्यांच्या कानावर ही बाब घालतानाच ऑपरेशन टायगरसाठीही त्यांची मान्यताही मिळवली. यानंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंद दरवाजाआड चर्चा केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या बैठकीत अखेर ऑपरेशन टायगरसाठी ग्रीन सिग्नल मिळताच पुन्हा एकदा पडद्यामागच्या राजकीय घडामोडींनी वेग पकडला. यानंतर ऑपरेशन टायगरसाठीच्या आवश्यक तांत्रिक गोष्टी तपासण्यात आल्याचं समोर आलं आहे.

यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षात येत असलेल्या ठाकरेंच्या खासदारांची संमती आणि कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. धक्कादायक माहिती अशी की, ऑपरेशन टायगर हे 3 महिन्यांपूर्वीच होणार होते. तेव्हाच सर्व खासदारांचाही होकार होता. पण एक अडचण समोर आली होती. ती अडचण दूर होताच ऑपरेशन टायगरला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरेंना धक्का देणाऱ्या राजकीय भूकंपाची स्क्रिप्ट ही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,अमित शाह यांनी लिहिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT