

Mumbai News : राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागेसाठी 18 जूनला मतदान होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली होती. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी दुरंगी लढत होत असतानाच मतदानासाठी एक दिवस शिल्लक असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार वेगळा गट स्थापन करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे. त्यातच आता गुरुवारी मतदान होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणूक रिंगणात हिंगोलीचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील-आष्टीकर हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून काय निर्णय घेतला जाणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या 17 पैकी सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित 11जागेसाठी 18 जूनला मतदान होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) परभणीचे खासदार संजय जाधव, धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचोरे, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, वाशिमचे खासदार संजय देशमुख, मुंबईतील खासदार संजय दिना पाटील या सहा जणांनी मिळून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना वेगळा गट स्थापन करण्याबाबट पत्र दिले आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा एकदा उभी फूट पडणार हे निश्चित मानले जात आहे.
विधान परिषदेच्या निवडणूक रिंगणात हिंगोलीचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील-आष्टीकर हे निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेसच्या रामदास पाटील सुमठाणकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी या ठिकाणच्या काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांना माघार घेण्यास लावली होती. त्यांच्याऐवजी महाविकास आघाडीने कृष्णा पाटील-आष्टीकर यांना अधिकृत उमेदवार म्हणून पाठींबा दिला होता. त्यामुळे आता उद्या होत असलेल्या मतदानापूर्वी याठिकाणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यातच आता राज्यात गुरुवारी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या फुटीचा वेगळा परिणाम या निवडणुकीवर दिसून येणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. विशेषतः मराठवाड्यातील विधान परिषदेच्या चार ही मतदारसंघात निवडणूक होत असून या ठिकाणचे तीन खासदार फुटीत सहभागी होत आहेत. धाराशिव-बीड-लातूरचे या मतदारसंघातील खासदार ओम राजेनिंबाळकर, परभणी-हिंगोली, नांदेड मतदार संघातील खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर यांचा सहभाग असल्याने या तीन ठिकाणच्या निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
हिंगोलीचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांनी नांदेड विधानपरिषद निवडणुकीमुळे उद्धव ठाकरे यांनी रविवारी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर असल्याचे सांगितले होते. त्यासोबतच त्यादिवशी पत्रकार परिषद घेऊन मी उद्धव ठाकरे यांच्यासॊबत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतरही आष्टीकर नॉट रिचेबल झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.