amol kolhe ajit pawar sarkarnama
महाराष्ट्र

Amol Kolhe News : "उमेदवारी देऊन चूक केली", अजितदादांच्या विधानावर कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, "10 वेळा..."

Akshay Sabale

लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Election 2024 ) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसं आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर मतदारसंघात जाऊन खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीकेचे 'प्रहार' सोडले होते. आता अमोल कोल्हेंनी जशास तसं प्रत्युत्तर देत अजित पवारांवर धावून गेले आहेत. "10-10 वेळा तुमच्या पक्षात येण्यासाठी निरोप कशाला पाठवले?" असा गौप्यस्फोट अमोल कोल्हेंनी ( Amol Kolhe ) केला आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

"लोकसभेला खासदार कोल्हे म्हणतील, 'आता यापुढं मी काम करेन.' बघा आत्ताही त्यांचे नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. त्यातून ते वातावरण निर्मिती करत आहेत. ही तात्पुरती आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आपल्याला जपायचा आहे. पण, कोल्हेंनी पाच वर्षे काय केलं? याचा विचार करा. कोल्हेंचा राजकारण हे पिंड नाही. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की कलाकार पुढं आणतो. राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अमिताभ बच्चन खासदार म्हणून निवडून आले. परत, त्यांनी राजीनामा दिला. मात्र, त्यांना मतदारांचे काही पडलेले नसतं. आपण राजबिंडा पाहून निवडून देतो. त्यात आमची चूक आहे," असं अजित पवारांनी ( Ajit Pawar ) म्हटलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला"

अजित पवारांच्या टीकेनंतर अमोल कोल्हेंनी ( Amol Kolhe ) 'एक्स' अकाउंटवर व्हिडिओ ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. "अजित पवार मोठे नेते आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीनं त्यांना उत्तर देणं उचित नाही, असं मी कायम बोलत आलो आहे. पण, अजित पवारांच्या वैयक्तिक आरोपांना उत्तर देणं क्रमप्राप्त आहे. राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अमिताभ बच्चन यांच्यातील एकाही खासदारास संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचं मी ऐकलं नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न हिरिरीने मांडत असताना पहिल्या टर्ममध्ये तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मला मिळाला आहे," असं कोल्हे म्हणाले.

"तटकरेंपेक्षा माझी कामगिरी उजवी"

"मी राजीनामा देण्याच्या विचारात होतो, मग संसदेत अनुपस्थितीत होतो का? प्रश्न मांडणं बंद केलं होतं का? आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ( सुनील तटकरे ) हे रायगड लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. आपल्या प्रदेशाध्यक्षापेक्षाही माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील एका मध्यमवर्गीय व्यक्तीची संसदीय कामगिरी ही उजवी आहे," असा टोला कोल्हेंनी लगावला आहे.

"लपून छपून भेटीगाठी कशाला घेतल्या?"

"असा उमेदवार चूक केल्याचं अजित पवारांनी म्हटलं. पण, ही अप्रत्यक्षपणे कबुली तर नाही ना? हा प्रश्न पडतो. कारण, ज्या आमदारांच्या पाठिंब्यावर आपण उपमुख्यमंत्री झाला आहात, त्यांना निवडून आणण्यासाठी 'शिवस्वराज्य यात्रा' काढण्यात आली होती. यात्रेची संकल्पना मी राबवली. राज्य सहकारी बँकेची चौकशी सुरू झाल्यानंतर जयंत पाटील यांच्या मदतीनं शिवसंकल्प यात्रा आम्ही पूर्ण केली. विधानसभेचा निकाल आल्यानंतर तुम्ही ( अजित पवार ) माझं कौतुक केलं होतं. त्यामुळे भूमिका बदलल्यानंतर भाषा बदलते का? 10-10 वेळा तुमच्या पक्षात येण्यासाठी निरोप कशाला पाठवले. लपून छपून भेटीगाठी कशाला घेतल्या?" असा सवालही कोल्हेंनी अजित पवारांना विचारला आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT