Maharashtra News: राज्यातील बहुचर्चित 29 महापालिका निवडणुकांचे निकाल लागले आहेत. या निकालात भाजपनं पुन्हा एकदा आपला नंबर वन राखला आहे. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. त्याखालोखाल काँग्रेस आहे. पण नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांच्या निकालात सर्वाधिक धक्का 'एमआयएम'नं दिला आहे.
लोकसभा,विधानसभा,नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या निकालांमध्ये एमआयएमनं जोरदार मुसंडी मारल्याचं दिसून आलं होतं. एवढंच नव्हे तर एमआयएमनं भाजप काँग्रेस, शिवसेना सारख्या पक्षाचं सत्तेचं गणितं बिघडवल्याचं समोर आलं होतं. आता महापालिका निवडणुकीतही एमआयएमनं 29 पैकी 13 महापालिकांमध्ये तब्बल 125 जागा जिंकून सर्वच राजकीय पक्षांना धक्का दिला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे 33 नगरसेवक विजय झाले आहे.त्यानंतर मालेगावमध्ये 20 नगरसेवक विजयी झाले आहेत. नांदेडमध्ये 15,अमरावतीत 12 तर मुंबई, सोलापूर, धुळे, नांदेड या महापालिकांमध्ये प्रत्येकी 8 नगरसेवक विजयी झाले आहे.भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये देखील एमआयएमने सात जागा मिळवल्या आहेत.
तसेच जालन्यात दोन जागा विजयी झाल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातही एमआयएमचे पाच नगरसेवक विजयी झाले आहेत. अशा एकूण महाराष्ट्रात 125 नगरसेवक निवडून आणण्यात एमआयएमला मोठं यश मिळालं आहे. या विजयानंतर आता एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, एमआयएमची कामगिरी ऐतिहासिक असल्याची भावना व्यक्त केली आहे. पण याचवेळी त्यांनी भाजप किंवा विरोधकांच्या इंडिया आघाडीसोबत जाणार नसल्याचंही स्पष्ट भूमिका मांडली आहे. आमची लढाई आम्हाला जनादेश देणाऱ्यांसाठी असेल,सत्तेच्या समीकरणासाठी नसल्याचंही ओवैसींनी ठणकावून सांगितलं.
असदुद्दीन ओवैसी यांनी हैदराबादमध्ये शनिवारी (ता.17) माध्यमांसोबत संवाद साधला.यावेळी त्यांनी एमआयएमच्या विजयाचं श्रेय महाराष्ट्रातील कार्यकर्ते आणि मतदारांना दिलं. याचवेळी त्यांनी विरोधी पक्षांकडून एमआयएमवर होत असलेल्या बी-टीमच्या आरोपांचाही समाचार घेतला. यावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपांवर आपल्याकडे कोणतंही उत्तर नसल्याचं म्हटलं.
पण जे लोक आम्हांला बी टीम म्हणतात ते आम्हाला मतदान करणाऱ्या लाखो मतदारांचा अपमान करत असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. याचवेळी त्यांनी जर तुम्ही जनादेशाचा अपमान कराल तर तुमचं नुकसान नक्की आहे,असा इशाराही विरोधकांना दिला.तसेच एमआयएमनं केवळ एका वर्गाची पार्टी राहिली नाही, असा दावाही त्यांनी केला.
महाराष्ट्रातील एमआयएमच्या मोठ्या यशानंतर खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आमचे काही हिंदू भाऊ, दलित, ज्यात अनुसूचित जाती आणि अनुसुचित जमातीचे उमेदवार आहेत,ते आमच्या पक्षाच्या चिन्हावर जिंकले आहेत. अकोट नगरपालिकेचा उल्लेख करत यापुढे कोणत्याही ठिकाणी अशी युती करु नका ज्यात भाजप सोबत असेल अशा स्पष्ट सूचना ओवैसी यांनी दिल्या आहेत. आपल्या पक्षात शिस्त सर्वात महत्त्वाची असल्याचंही म्हटलं आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी माध्यमांशी बोलतानाच पश्चिम महाराष्ट्रात अधिक लक्ष देऊ शकलो नसल्याची खंतही व्यक्त केली. तिथे अधिक वेळ दिला असता तर त्या ठिकाणी एमआयएमच्या विजयी उमेदवारांची संख्या वाढलेली दिसली असती असंही ते म्हणाले.
याचदरम्यान,त्यांनी ओवैसी यांनी विजयी झालेल्या उमेदवारांची जबाबदारी वाढल्याचंही म्हटलं आहे. त्याचवेळी विजयी झालेल्या एमआयएमच्या सर्व नगरसेवकांनी विजयानं हुरळून जाऊ न जाता लोकांची सेवा करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.