Chhatrapati Sambhajinagar News: फुलंब्री : छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने फुलंब्री नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारीमुळे तळागाळातील कार्यकर्त्यापासून विधान परिषद उमेदवारापर्यंतचा त्यांचा प्रवास पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
फुलंब्रीच्या राजकारणात सुहास शिरसाट हे गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सक्रिय आहेत. नगरपंचायत अस्तित्वात येण्यापूर्वी त्यांनी तब्बल 15 वर्षे फुलंब्री ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम पाहिले. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर काम करत त्यांनी स्थानिक नेतृत्व म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. गावपातळीवरील नेतृत्वातून त्यांनी जनसंपर्क आणि संघटनात्मक कौशल्य विकसित केले.
10 जून 2015 रोजी फुलंब्री नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना फुलंब्रीचे पहिले नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले. नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात शहरातील विकासकामे, नागरी सुविधा आणि प्रशासनातील समन्वय यामुळे त्यांची ओळख अधिक मजबूत झाली.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनुभवाबरोबरच त्यांनी सहकार क्षेत्रातही आपले स्थान निर्माण केले. सध्या ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, फुलंब्री या महत्त्वाच्या संस्थांवर संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतकरी प्रश्न आणि सहकार क्षेत्राशी त्यांचा जवळचा संबंध राहिला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीतही त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्ष संघटना विस्तार, कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करणे आणि विविध निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. विशेष म्हणजे, तळागाळातील कार्यकर्त्यांशी कायम संपर्क ठेवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
दरम्यान, त्यांच्या उमेदवारीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. राज्यपाल हरिभाऊ बागडे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्याशी असलेले त्यांचे निकटचे संबंधही उमेदवारीसाठी अनुकूल ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र, त्याचबरोबर पक्षासाठी केलेले सातत्यपूर्ण काम, संघटनात्मक कौशल्य, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनुभव आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा यांची दखल घेऊनच पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखविल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांचे मत आहे.
छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपकडे असलेल्या भक्कम संख्याबळामुळे सुहास शिरसाट यांच्या विजयाच्या शक्यता अधिक बळकट मानल्या जात आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील भाजपच्या सदस्यसंख्येचा विचार करता ही निवडणूक पक्षासाठी तुलनेने सोपी मानली जात आहे.
एकूणच, सरपंच, नगराध्यक्ष, संचालक, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि आता विधान परिषद उमेदवार असा सुहास शिरसाट यांचा राजकीय प्रवास हा तळागाळातील कार्यकर्त्याला मिळालेल्या संधीचे उदाहरण मानला जात आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे केवळ निवडणुकीच्या दृष्टीने नव्हे, तर पक्षातील दीर्घकालीन कार्याला मिळालेली पोचपावती म्हणूनही पाहिले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.