Mumbai News : राज्यात सध्या राजकीय घडामोडीना वेग आला आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात न आल्याने ते नाराज आहेत. तर दुसरीकडे नागपुरातील सहा दिवसीय हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजल्यानंतर लगेचच मंत्रिमंडळाचे खातेवाटप करण्यात आले. खातेवाटप मार्गी लागल्यानंतर नवे मंत्री त्यांच्या मतदारसंघांमध्ये परतले आहेत. त्यातच आता राज्यातील 11 जिल्हयात दोन किंवा त्यापेक्षा अधिक मंत्री असल्याने याठिकाणी आता पालकमंत्रिपदाची माळ पदरात पडावी यासाठी महायुतीमधील तीन घटक पक्षात सध्या जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. (Mahayuti News)
हिवाळी अधिवेशन संपवून मतदारसंघांमध्ये परतलेल्या नव्या मंत्र्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. हे सर्वच मंत्री आता सोमवारपासून नव्या खात्याचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यानंतर मंत्रिपदासाठी लॉबिंग करणारे आमदारा आता पुन्हा एकदा पालकमंत्रिपदासाठी फिल्डींग लावताना दिसत आहेत. या पदावरून आता पुन्हा एकदा महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपसहित राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात चुरस पाहावयास मिळत आहे.
15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता खातेवाटप झाल्याने मंत्रिपद मिळाल्यानंतर आता पुढची शर्यत पालकमंत्रिपदासाठी सुरु झाली आहे. राज्यातील तब्बल 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदांसाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
पालकमंत्रिपदासाठी ठाणे, पुणे, रायगड, नाशिक, बीड, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, रत्नागिरी, कोल्हापूर व यवतमाळ अशा 11 जिल्ह्यात पालकमंत्रिपद कोणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काही जिल्ह्यांना दोन, तर काही जिल्ह्यांना चार मंत्रिपदं मिळाली आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपदासाठी तीव्र स्पर्धा आहे. कुठे एकाच पक्षाच्या दोन मंत्र्यांमध्ये, तर कुठे मित्रपक्षाच्या मंत्र्यांमध्ये जोरदार चढाओढ दिसत आहे. त्यामुळे मंत्रिपदाची शर्यत संपताच पालकमंत्रिपदासाठीची स्पर्धा सुरु झाली आहे.
या जिल्ह्यांसाठी या मंत्र्यांमध्ये चुरस?
ठाणे जिल्ह्यात पालकमंत्रीपदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शिवसेना), गणेश नाईक (भाजप) यांच्यामध्ये रस्सीखेच आहे. रायगड जिल्ह्यात आदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस), भरत गोगावले (शिवसेना) या दोघामंध्ये चुरस आहे. नाशिक जिल्ह्यात गिरीश महाजन (भाजप), दादा भुसे (शिवसेना), नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी काँग्रेस), माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस) या चार जणांमध्ये स्पर्धा लागली आहे. जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील (शिवसेना), संजय सावकारे (भाजप) (BJP) या दोन जणापैकी एकाची निवड करावी लागणार आहे.
पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), चंद्रकांत पाटील (भाजप) या दोन इच्छुकांमध्ये कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे (भाजप), धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस) या दोघांपैकी एकाची निवड करावी लागणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संजय शिरसाट (शिवसेना), अतुल सावे (भाजप) या दोघांत कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. यवतमाळ जिल्ह्यात अशोक उईके (भाजप), संजय राठोड (शिवसेना), इंद्रनिल नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस) या तीन पैकी एकाची वर्णी लागणार आहे.
सातारामध्ये शंभुराज देसाई (शिवसेना), शिवेंद्रराजे भोसले (भाजप), जयकुमार गोरे (भाजप), मकरंद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) या चार जणांमध्ये चुरस आहे. रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत (शिवसेना), योगेश कदम (शिवसेना) या दोघांपैकी एकाला संधी मिळणार आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रकाश आबिटकर (शिवसेना) या दोघांपैकी कोणाची निवड होणार याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.