Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray  Sarkarnama
महाराष्ट्र

BMC elections : मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने टाकला मोठा 'बाँब'; 'स्वबळा'च्या घोषणेने महाविकास आघाडीत 'ठिणगी'!

Congress go solo Mumbai elections News : निवडणुकीच्या तोंडावरच महाविकास आघाडीतील गटबाजी चव्हाटयावर आली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. दिवाळीनंतर निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असतानाच आता महाविकास आघाडीत काँग्रेसच्या स्वबळावर निवडणूक लढण्याच्या घोषणेमुळे पहिली ठिणगी पडली आहे. आगामी काळात होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केले.

त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावरच महाविकास आघाडीतील गटबाजी चव्हाटयावर आली आहे. गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीसोबत राज ठाकरे येणार असल्याची चर्चा रंगली असताना त्या चर्चेला भाई जगताप यांच्या घोषणेने पूर्णविराम मिळाला आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेसच्या नेत्यांना स्वबळावर लढ्याच्या आहेत. या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढ्याला हव्यात अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे आता येत्या काळात काँग्रेसने (congress) स्वबळ अजमावण्याची तयारी सुरु केली असल्याची माहिती काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे. त्यासोबचत आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा राज व उद्धव ठाकरे यांच्यासॊबत एकत्र लढणार नाही, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य त्यांनी केले.

काँग्रेसच्या राजकीय कामकाज समितीची बैठक नुकतीच झाली. त्यामध्येही मी रमेश चेन्निथला यांच्यासमोर हीच गोष्टी सांगितली. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, नेत्यांच्या नाही. जे काँग्रेस कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आहेत, त्यांचीही इच्छा असते, आपणही कधी ना कधी निवडणू लढवावी. त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या. कोणी कोणासोबत लढायचे, हे स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या. आम्ही मुंबईतील स्थानिक कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही मुंबईत स्वबळावर लढूयात, असे काँग्रेसच्या बैठकीत सांगितल्याचे भाई जगताप यांनी यावेळी सांगितले.

येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या सोबत जाऊ नये, राज ठाकरेंचा तर प्रश्नच येत नाही. काँग्रेसने आजपर्यंत कधीही, 'राज ठाकरेंना सोबत घेऊ', असे म्हटलेले नाही. मविआत शिवसेना एकटीच नाही. उद्धव ठाकरे मविआत आले तेव्हा शिवसेना एकटीच होती. आता दोन शिवसेना झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत स्बळावर लढण्याबाबतचा निर्णय काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांवरच सोडावा. स्थानिक कार्यकर्त्यांची ठाकरे बंधूंसोबत एकत्र निवडणूक लढण्याची इच्छा नाही, असे भाई जगताप यांनी सांगितले.

काँग्रेस हायकमांडशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेणार

मनसेसोबत आमचे मुलभूत मतभेद आहेत, त्यामध्ये काही शंका नाही. प्रत्येक नेत्याची भूमिका रमेश चेन्नीथला यांनी ऐकून घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन वरिष्ठ नेते निर्णय घेतले जातात. काँग्रेस हायकमांड याबाबत सगळ्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेईल, असे काँग्रेसच्या मिडिया सेलचे प्रमुख सचिन सावंत यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT