Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर मराठवाड्यातल्या बीड,जालना,परभणी या जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी गृहखातं आणि पोलिस प्रशासनही हादरलं आहे. एक प्रकरण थांबत नाही, तेच दुसरं प्रकरण समोर येत आहे. गंभीर आरोपांनंतर आधी धनंजय मुंडेंच्या हातून पालकमंत्री पद गेलं,नंतर मंत्रीपदाचाही राजीनामा दिला गेला.
यानंतरही आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण गेल्या काही महिन्यांपासून तापलं असून आता कडक या जिल्ह्यात करडी शिस्त आणि धडाकेबाज निर्णयांसाठी प्रसिध्द असलेल्या सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंकडे (Tukaram Mundhe) लवकरच बीड जिल्ह्यासह मराठवाड्याची विशेष जबाबदारी देणार का अशी चर्चा झडू लागली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवारांनी हे सरकार पारदर्शी,स्वच्छ कारभाराची ग्वाही दिली जाते. पण हेच सरकार बीड (Beed) जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात धनंजय मुंडेंमुळे प्रचंड बॅकफूटला गेले आहे.
त्याचमुळे फडणवीसांनी या प्रकरणात उज्जवल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. आता तेच सरकार बीड,जालना,परभणी यांसारख्या जिल्ह्यात ज्याप्रकारे गुन्हेगारी घटनांनी डोकं वर काढलं आहे,त्यामुळे पुन्हा एकदा धडाकेबाज निर्णय घेण्याची शक्यता आहे.
करड्या शिस्तवरून प्रशासन आणि राजकारण्यांच्या नाकावर टिच्चून धडाकेबाज निर्णय घेणारे प्रसंगी मंत्र्यांचाही विरोध झुगारून आपल्या भूमिकेवर ठाम राहणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची ओळख आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंढे यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले होते.
त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सत्तापालट झाल्यानंतर मुंढे यांच्याकडे आरोग्य विभागातील महत्वाचे पद देण्यात आले होते. त्यांनी त्यानंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे असलेल्या कृषी, पशुसंवर्धन खात्याच्या सचिव पदावर बदली करण्यात आली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा तापलेल्या बीडसारख्या जिल्ह्यांतील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तुकाराम मुंढेंसारखा दबंग अधिकारी तिथं पाठवणार का याची चर्चा सुरू झाली आहे. महत्त्वाची जबाबदारी देणार का
तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत येण्यापाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी कारणीभूत ठरली आहे.त्यांनी सरकारकडे बीड,जालना आणि परभणीत गेल्या काही महिन्यांतील वाढत्या गुन्हेगारीच्या हादरवून टाकणार्या घटना पाहता ही मागणी केली आहे. या जिल्ह्यातील गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात यावी,अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.
अंजली दमानिया यांनी मंगळवारी (ता.11) मुंबईत मीडियाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याबाबत मोठं विधान केलं.त्या म्हणाल्या, तुकाराम मुंढेंसारख्या सक्षम अधिकाऱ्याची मराठवाड्यात डिव्हिजनल कमिशनर म्हणून नियुक्ती होणे, गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जालना, बीड आणि परभणीसह मराठवाड्यात गुन्हेगारी प्रकरणं बाहेर येत आहेत. त्यामुळे आता बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंढे व्हायला हवं,असंही त्यांनी म्हटलं.
दमानिया म्हणाल्या, जालना, बीड आणि परभणीतील घटना पाहता मराठवाड्याला खमका अधिकारी देण्याची गरज आहे.हा अधिकारी कोणाचंही न ऐकणारा, कोणालाही न जुमानणारा असायला हवा. त्यामुळे आता बीडसह मराठवाड्यात मुंडे विरुद्ध मुंढे करण्याची वेळ आली आहे, असे सांगतानाच त्यांनी राज्य सरकारनं बीडमध्ये तुकाराम मुंढे यांना अधिकारी म्हणून पाठवले पाहिजे अशी परखड भूमिकाही मांडली.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.