Mumbai News : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पडले होते. त्यावेळी शिवसेनेचे 40 आमदार व 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. आठ महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सत्तेत आली असली तरी मुख्यमंत्रीपद यावेळी भाजपने स्वतःकडे घेतले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मात्र, मुख्यमंत्रीपदाची पुन्हा संधी मिळेल ? याची एकनाथ शिंदे वाट पाहत असून त्यासाठी त्यांची शिवसेना ते भाजपमध्ये विलीन करतील, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात असतानाच भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याविषयी सडेतोड उत्तर दिले आहे.
आमदार रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर 'सरकारनामा'ला मुलाखत दिली. याप्रसंगी चव्हाण यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भाजपमध्ये विलीन होण्याशिवाय पर्याय नाही, अशी चर्चा आहे. तुमचे याविषयी काय मत आहे? असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर चव्हाण म्हणाले, 'त्यांना भाजपमध्ये विलीन होण्याची का आवश्यकता आहे? सध्या भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन वेगवेगळे पक्ष चाललेत ना. प्रत्येकाने स्वत:च्या पक्षाच्या विचारधारेशी कायम राहून पक्ष पुढे नेला पाहिजे,' असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. भाजपमध्ये आले तर ती इच्छा पूर्ण होण्याची संधी असल्याचे म्हटले जाते, या विषयी काय सांगाल ? अशी विचारणा रवींद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आली. यावेळी ते म्हणाले, 'या विषयी मला काही माहित नाही, असे काही असेल तर तो त्यांचा प्रश्न असू शकतो. मात्र, मला वाटते असे काही नाही. भाजप फार मोठा पक्ष आहे. आमच्या पक्षाची वैचारिक भूमिका आहे. पक्षामध्ये जे कुणी चांगले-वाईट लोके जोडली गेलीत ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत.'
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून सातत्याने एकनाथ शिंदे भाजपमध्ये जातील अशी चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्रीपदाची पुन्हा संधी मिळेल याची एकनाथ शिंदे वाट पाहत असून त्यासाठी त्यांची शिवसेना ते भाजपमध्ये विलीन करतील, अशी चर्चा जोरात रंगली आहे. त्यामुळे याबाबत काही राजकीय विश्लेषकांनी देखील वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत.
दरम्यान, अधिवेशनकाळात एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यावर मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले. विशेषतः भ्रष्टचाराचे आरोप करण्यात आले. त्याशिवाय मंत्री संजय शिरसाट यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या समोरील अडचणी ऐन अधिवेशन काळात वाढल्या होत्या. त्याच वेळी त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत शिवसेना पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याविषयी चर्चा केली असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.