हिंदी सक्तीवरून राजकीय संघर्ष: ठाकरे बंधू (राज व उद्धव) एकत्र येऊन हिंदी सक्तीविरोधात आक्रमक झाले, महायुती सरकारने दोन जीआर मागे घेत माघार घेतली.
राजकीय वातावरण तापले: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी विरुद्ध हिंदी हा मुख्य प्रचार मुद्दा ठरणार असून सर्व पक्षांनी एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
नेत्यांचे परस्पर आरोप: अधिवेशनानंतर फडणवीस, ठाकरे व राज यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले; मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला आहे.
Mumbai News : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा तापला आहे. हिंदी सक्तीचे दोन जीआर मागे घेत महायुती सरकारने दोन पावले मागे घेतली आहेत. त्यानंतर हिंदी सक्तीच्या विरोधातील मुद्द्यांवरून एकत्र आलेल्या ठाकरे बंधुंचा आवाज वाढला आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हाच प्रचाराचा मुद्दा असणार असल्याने आतापासूनच मनसे, उद्धव ठाकरेंची शिवसेना व भाजपने एकमेकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे, उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. त्यामुळे राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले आहे.
गेल्या महिनाभरापासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यांवरून एकमेकांना टार्गेट केले जात आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात राज व उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत महिनाभरापूर्वीच रस्त्यावर उतरून मोर्चा काढण्याची तयारी दर्शवली होती. पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच राज्यातील वातावरण हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून तापले होते. ठाकरे बंधूनी या मुद्यावरून एकत्र येत मोर्चा काढण्याची तयारी सुरु केली होती. त्यामुळे दबाव वाढल्याने महायुती सरकारने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर मागे घेत माघार घेतली होती. त्यामुळे महायुती सरकार बॅकफूटवर आल्याचे दिसले.
त्यानंतर ठाकरे बंधूनी एकत्र येत वरळीत विजयी मेळावा घेतला. हा मेळाव्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता येत्या काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणूक याच मुद्द्यावरून लढली जाण्याची शक्यता आहे. त्याच मुळे शुक्रवारी पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा मराठीच्या मुद्द्यांवरून तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकमेकांवर टीका टिपण्णी केली आहे.
हिंदी सक्तीबाबत मी मुख्यमंत्री असताना कोणतेही अंमलबाजवणी केली नव्हती. माशेलकर समितीचा अहवाल सादर केला पण स्वीकारलेला नाही. त्यामुळे येत्या काळात राज्यात कोणत्याही भाषेची सक्ती लागू होऊ देणार नाही. त्यासोबतच राज्यात हिंदी भाषेची सक्ती तर करूच देणार नसल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशन संपताच केली आहे.
ज्यावेळी निवडणुका जवळ येतात, तेव्हा काही लोक मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याची भीती दाखवतात. हे केवळ जनतेच्या भावना भडकवण्यासाठीच केले जाते, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत कोणाचे न नाव न घेता केली. तर कुणाचा बाप, त्याचा बाप, त्याचा बाप, आजा-पंजा आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही असे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिले होते. त्यामुळे या मुद्द्यांवरून येत्या काळात वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
मीरा भाइंदरमध्ये राज ठाकरे यांची शुक्रवारी सभा पार पडली. या सभेवेळी हिंदी सक्तीच्या मुद्द्यांवरून त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्ला चढविला. हिंमत बघा कशी होते यांची. तुम्ही काही बोलला तर राष्ट्रीय बातमी होते. पण हे काही बोलतात तेव्हा त्यांना माहीत असते सरकार आमच्या मागे आहे. सरकारचे या गोष्टी लादणार असेल तर या लोकांची हिंमत वाढणारच आहे. तुमची सत्ता लोकसभेत आणि विधानभवनात. आमची सत्ता रस्त्यावर आहे. हा महाराष्ट्र आहे. परत कोणी वेडावाकडा वागण्याचा प्रयत्न केला तर त्याचा गाल आणि हात या सर्व गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला आहे.
पावसाळी अधिवेशन संपल्यांनंतर सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली आहे, विरोधी पक्षाकडून जोरदार टीका करण्यात आली. तीन आठवडे चाललेले हे अधिवेशन विविध कारणाने चांगलेच गाजले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या पूर्वसंध्येला विधानसभेत झालेल्या हाणामारीच्या घटनेने सर्वचस्तरातून टीकेची झोड उठली आहे.वेगवेगळ्या मुद्यांवरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळाले. दरम्यान, विरोधकानी आक्रमक होत संख्या कमी असली तरी सत्ताधारी मंडळींना चांगलेच घेरले होते.
प्रश्न: हिंदी सक्तीच्या विरोधात कोणते नेते एकत्र आले आहेत?
उत्तर: राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मोर्चा काढण्याची तयारी दाखवली.
प्रश्न: महायुती सरकारने हिंदी सक्तीबाबत काय निर्णय घेतला?
उत्तर: दोन जीआर मागे घेत हिंदी सक्तीबाबत माघार घेतली.
प्रश्न: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कोणता मुद्दा चर्चेत राहणार आहे?
उत्तर: मराठी भाषा आणि हिंदी सक्तीविरोध हा मुख्य प्रचार मुद्दा ठरणार आहे.
प्रश्न: फडणवीस यांनी विरोधकांवर काय टीका केली?
उत्तर: मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याची भीती उगाचच निर्माण केली जाते, असा आरोप केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.