Ramdas Kadam, Bhaskar Jadhav
Ramdas Kadam, Bhaskar Jadhav sarkarnama
कोकण

Ratnagiri News : भास्कर जाधव सुरतपर्यंत गेले होते..! रामदास कदमांचा पुन्हा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्युरो

Ratnagiri News : ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण येथे सभा घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर आता शिवसेनेचे नेते माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या बाबतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'भास्कर जाधव गुजरात बॉर्डरपर्यंत गेले होते.., असा मोठा गौप्यस्फोट रामदास कदमांनी केला आहे.

गुवाहाटीसाठी भास्कर जाधव बॅग घेऊन तयार होते', असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी केला होता. योगेश कदमांच्या या दाव्यानंतर आता वडील रामदास कदमांनीदेखील मोठा दावा केला आहे. आता भास्कर जाधव म्हणणार मी गेलोच नाही, मी निष्ठावान आहे. पण एकनाथ शिंदेंना खासगीत विचारलंच तरी तेदेखील तुम्हाला सांगतील, असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.

दीड वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उठाव केला होता तेव्हा भास्कर जाधव हे शिंदे गटात येणार होते. परंतु, त्यावेळी भाजपने विरोध केल्यामुळे इच्छा असूनही भास्कर जाधव यांना माघारी फिरावे लागले, असा खळबळजनक गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी उठाव केला तेव्हा शिवसेनेचे अनेक आमदार सुरतमध्ये गेले होते. भास्कर जाधव हे गुजरातच्या सीमेपर्यंत येऊन माघारी फिरले होते. भास्कर जाधव हे सुरतच्या जवळ पोहोचले होते तेव्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून त्याना सांगण्यात आले की, तुम्हाला आमच्यासोबत घेता येणार नाही. भाजपकडून तुम्हाला आमच्या गटात घेण्यास विरोध केला जात आहे.

भास्कर जाधव यांनी मोदींची केलेली नक्कल आणि अधिवेशनावेळी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केल्यामुळे त्यांच्या शिंदे गटातील समावेशाला विरोध करण्यात आला, अशी माहिती माझ्याकडे असल्याचे रामदास कदम यांनी म्हटले. भास्कर जाधव यांना त्यावेळी शिंदे गटात येण्याची इच्छा होती, पण शिवसेना नेतृत्वाने त्यांना सांगितले की, थोडे दिवस थांबा, आम्ही भाजपची समजूत घालतो.

पण, भाजपने नंतरही भास्कर जाधव यांच्या समावेशाला विरोध कायम ठेवल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. त्यामुळेच भास्कर जाधव आता उद्धव ठाकरे यांना तुम्ही भाजपसोबत गेल्यास मी तुमच्यासोबत येणार नाही, असे म्हणत आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रामदास कदम यांनी हा मोठा दावा केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, भाजपने नकार दिल्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्वाने त्यांना सांगितले की, तुम्ही थोडे दिवस थांबा, आम्ही त्यांचं मन वळवायचा प्रयत्न करतो. म्हणून सुरतच्या बॉर्डवरून भास्कर जाधव मागे गेले का? याबाबत खात्री केली पाहिजे. उद्या समजा उद्धव ठाकरे भाजपमध्ये गेले तर यांना घेतील की नाही यात शंका आहे.

कारण भास्कर जाध‌व यांना ठाकरे भाजपसोबत जातील असे वाटते, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय ना. भास्कर जाधव यांना अचानक साक्षात्कार झाला का, ठाकरे भाजपसोबत चालले आहेत. त्यांना कुठेतरी, काहीतरी कळतंय पाणी मुरते आहे म्हणून ते बोलतात, असाही खळबळजनक दावादेखील रामदास कदम यांनी केला आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT