Kokan News : महायुतीनं विधानसभा निवडणुकीतील दणदणीत कामगिरीनंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीतील भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगेसनं विरोधी पक्षांतील नेत्यांसाठी गळ टाकण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सह मनसेच्या नाराज नेत्यांनाही पक्षात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. अशातच आता कोकणात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
एकीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या धर्तीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता कोकणात मनसेला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.राज ठाकरेंचे कट्टर समर्थक राहिलेले मनसेचे कोकणातील बुलंद तोफ व आक्रमक नेते वैभव खेडेकर हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. यातच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केल्यामुळे कोकणात मनसेला जोर का झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांनी 'निष्ठवंतांना पक्षात कवडीचीही किंमत नसते'असं व्हाटस अप स्टेटस ठेवलं होतं. यानंतर कोकणात राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं. यानंतर आता खेडेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यात त्यांनी आम्ही मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेसाहेबसोबत असल्याचं सांगितलं आहे. तसेच याचसाठी आम्ही कोणासोबतही राजकीयदृष्ट्या पंगा घ्यायलाही कमी केलेलं नसल्याचं ठणकावलं आहे.
तसेच याचाच परिणाम आमच्या व्यवसाय अन् कुटुंबावरही झाला.आम्ही आजवर मनसे पक्षासाठीच झिजलो, मात्र राजसाहेबांना काही नेते चुकीची माहिती देत असल्याचा गंभीर आरोपही वैभव खेडेकर यांनी यावेळी केला. तसेच शिवाजी पार्क मित्रमंडळ हेच त्यांना चुकीची माहिती देत असल्याचा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
खेडेकर म्हणाले, आमचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे आपणच नाही, तर असंख्य जुने पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भेटीची वेळ मागितली आहे. भेटीची वेळ मिळेल असा विश्वास व्यक्त करतानाच राजसाहेबांसमोर आम्ही आमची बाजू मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
याचदरम्यान ,वैभव खेडेकर यांनी आपण राज ठाकरेंकडे दुःख व्यक्त करणार आहे.तसेच आपण पक्ष सोडणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.तसेच इतर पक्षांकडून आलेल्या ऑफर हा त्या पक्षातील संबंधित नेत्यांचा मोठेपणा आहे.मात्र, आपण कधीही पक्ष सोडणार असं विधान केलं नसल्याचं सांगितलं आहे. हे त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.
वैभव खेडेकर यांनी कोकणात राज ठाकरेंना मोठा दिलासा आणि बड्या बड्या प्रस्थापित नेत्यांना धक्का देत खेड नगरपरिषद पहिल्यांदाच मनसेकडे खेचून आणली होती.आता त्याच वैभव खेडेकरांच्या नाराजीच्या चर्चा समोर येऊ लागल्यानं राजकीय वर्तुळासह मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
वैभव खेडेकर यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे नाराजीच्या चर्चांना आणखीच हवा मिळाली. यावर त्यांनी आम्हाला पक्षात अत्यंत अपमानास्पद आणि चुकीची वागणूक मिळत असल्याचं विधान करत कोकणच्या राजकारणात धमाका केला आहे. काही दिवसांपूर्वीच रत्नागिरी येथील चिंचघरमध्ये मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी वैभव खेडेकर यांना पक्षात येण्याची जाहीर ऑफर दिली होती.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मंत्री शंभूराज देसाई, उदय सामंत, मंत्री योगेश कदम आणि माजी आमदार संजय कदम,रामदास कदम यांच्यासोबतच मनसे नेते वैभव खेडेकर हेही उपस्थित राहिल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ते सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.
वैभव खेडेकर यांच्याकडे मनसेच्या राज्य सरचिटणीसपदाची जबाबदारी आहे.त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेशाचा निर्णय जर घेतला,तर मनसे आणि राज ठाकरेंसाठी कोकणात सर्वात मोठा धक्का मानला जाणार आहे.कारण राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि मनसेचा आक्रमक चेहरा म्हणून खेडेकरांकडे पाहिले जाते
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.