Raigad Political Controversy Latest News : रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या दाव्यामुळे चांगलेच तापले आहे. अशातच तटकरेंच्या सोबत घरोबा केलेल्या आमदार महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्यामुळे देखील नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
थोरवे यांनी भरतशेठ गोगावले यांच्या पालकमंत्रीपदासाठी झालेल्या संघर्षाचा उल्लेख करताना राजकीय दबावतंत्राचा वापर करून संघर्षशील नेतृत्वाला रोखण्याचे प्रयत्न झाले. तटकरेंनी पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ज्यांच्या पाठीशी संघर्षाची ताकद आणि जनतेचा विश्वास आहे, अशा नेतृत्वाला कोणीही रोखू शकत नाही. यामुळे भरतशेठ, सावध व्हा, तटकरेंना आवरा, अन्यथा दळवींच्या खांद्याला खांदा लावून आम्ही देखील कार्यक्रम करू, असा इशारा थोरवे यांनी दिला आहे.
एकीकडे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी गोगावलेंच्या समोरच अनिकेत तटकरेंचा पुन्हा एकदा सरोगसी बाळ म्हणत हल्लाबोल केला. तसेच तटकरे कुटुंब भाजपमध्ये प्रवेश करणार होतं, असा दावा केला. तर लोकसभेच्या जागेवर पुन्हा एकदा दावा करत शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास व्यक्त केला.
दुसरीकडे तटकरेंबरोबर घरोबा केलेल्या आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील जोरदार हल्लाबोल केला. कोकण विधान परिषद निवडणुकीवरून आणि कर्जतमधील विकासकामांच्या श्रेयवादावरून थोरवे यांनी टीका केली. थोरवे म्हणाले, गोगावले यांच्या पालकमंत्रीपदासाठी संघर्ष झाला असून, ते मिळू नये म्हणून रायगडच्या नेत्यांनी राजकीय दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप तटकरे यांचे नाव न घेता केला. मात्र, ज्यांच्या पाठीशी संघर्षाची ताकद आणि जनतेचा विश्वास आहे, अशा नेतृत्वाला कोणीही रोखू शकत नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायगडावर स्वराज्याची राजधानी उभारली, त्या ऐतिहासिक आणि स्वाभिमानी रायगड जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्री मिळणे ही अभिमानाची बाब आहे. हा विजय केवळ नामदार भरतशेठ गोगावले यांचा नसून, शिवसेनेचा, भगव्याचा आणि रायगडच्या स्वाभिमानाचा विजय असल्याचे थोरवे म्हणाले.
थोरवे यांनी, एकीकडे राज्यात महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र असले तरी, रायगडच्या राजकारणात मात्र तशी स्थिती नाही. येथे राष्ट्रवादीकडून चुकीच्या पद्धतीने राजकारण केलं जात आहे. कर्जत येथील रेल्वे पुलांच्या मंजुरीवरून देखील श्रेय घेतलं. संपूर्ण कर्जतमध्ये बॅनरबाजी केली आणि सांगून टाकलं की, हे तिन्ही पूल तटकरेंनी केलेत.
पण आता सांगावं लागतं की, २०२४ ला तुम्हाला जनतेनं नाकारलं, मला निवडून दिलं. तर लोकप्रतिनिधी म्हणून आमचे खासदार आहेत. तरीही पुन्हा एकदा रडीचा डाव राष्ट्रवादी आणि तटकरेंकडून खेळला जात आहे. तर नगरपालिकेत सत्ता असतानाही १० लाखांचेही काम केलेलं नाही. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना! अशी गत त्यांची झाली आहे. यामुळे आत्ताच तुम्हाला सावध करत आहे.
नाहीतर परवापासून आम्हाला काही सांगू नका, महेंद्र दळवी यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही देखील कार्यक्रम पुन्हा सुरू करू. मग थांबणार नाही. एकदा त्यांना बसवून समज द्या, हवं तर मग शिंदेंकडे न्या किंवा कुठं न्यायचं तिकडं न्या. पण समज द्या. तटकरे यांच्या माध्यमातून जो रडीचा डाव खेळला जातोय, राष्ट्रवादीकडून जे चुकीचे राजकारण सुरू आहे, ते शिवसेना खपवून घेणार नाही, असा देखील इशारा थोरवे यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.