Protest against Barsu Refinery
Protest against Barsu Refinery Sarkarnama
कोकण

Barsu Refinery Protest: भर उन्हात महिलांचा आक्रोश; बारसू रिफायनरीचा वाद आहे तरी काय?

सरकारनामा ब्युरो

Ratnagiri Barsu Refinery : भारत आणि सौदी अरेबियामध्ये झालेल्या करारानुसार भारतात जगातील सर्वात मोठा ऑईल रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (आरआरपीसीएल) ही कंपनी स्थापन करण्यात आली. या कंपनीत इंडियन ऑइल कॉर्परेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांची भागिदारी आहे.

करारानुसार या प्रकल्पासाठी रत्नागिरीतील (Ratnagiri) समुद्रकिनारा प्रस्तावित करण्यात आला होता. त्यानुसार हा प्रकल्प राजापूरमधील नाणार येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यास स्थानिकांचा प्रचंड विरोध झाला. त्यामुळे २०१९ मध्ये नाणार येथील प्रकल्प रद्द करण्यात आला. त्यानंतर हा प्रकल्प एमआयडीच्या माध्यमातून राजापूर (Rajapur) तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर, नाटे, सोलगाव या परिसरात प्रस्तावित केला. हा प्रकल्प बारसू-सोलगाव परिसरातील तीन हजार ४०० एकर जमिनीवर उभारण्यात येणार आहे. त्यानुसार या परिसरातील माती परीक्षणाचे काम सोमवार (ता. २४)पासून सुरू केले आहे. या कामास स्थानिकांनी विरोध केला आहे.

दरम्यान, शिवसेनेने यापूर्वी स्थानिक रहिवाशांच्या विरोधाचा हवाला देत या प्रकल्पाला विरोध केला होता. त्यानंतर बारसू-सोलगाव परिसराची जागा निश्चित करण्यात आली. आता बारसू रिफायनरी (Barsu Refinery Project) प्रकल्पासाठी परिसरातील माती परीक्षण व इतर चाचण्यांसाठी काही बोअरवेल घेण्यात येणार आहेत. मात्र या परिसरातून रिफायनरी हद्दपार करण्यासाठी स्थानिक महिला आणि पुरुष रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी माती परीक्षणासाठी आलेल्या यंत्रणेला जोरदार विरोध केला. यावेळी जमलेल्या महिलांनी भर उन्हात रस्त्यावरच झोपून आंदोलन केले. त्यावेळी आंदोलकांनी कोकणातून प्रकल्प रद्द होत नाही, माती सर्वेक्षण थांबत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली.

गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक पर्यावरण कार्यकर्ते आणि रहिवासी कोकण (Konkan) विभागातील रिफायनरी प्रकल्पाला विरोध करत आहेत. त्यांनी या रिफायनरी मोठ्या प्रमाणात प्रदुषण होईल. या प्रदुषणामुळे कोकणातील निसर्गाला धोका पोहचेल. येथील नैसर्गिक साधनसंपत्ती नामशेश होईल. तसेच येथील प्रसिद्ध काजू, सुपारी, नारळ, हापूस आंब्याच्या बागांवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होईल. मासेमारी धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त केली आहे.

आता रिफायनरीसाठी होत असलेल्या माती चाचणीला स्थानिकांचा विरोध वाढत आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी शेकडो अधिकारी आणि १८०० पोलीस कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. तसेच 'एसआरपीएफ'च्या तीन तुकड्याही रत्नागिरीत दाखल होणार आहेत. रत्नागिरीसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून अधिक पोलिसांचे पथके बोलवण्यात आली आहेत. पोलिसांच्या (Police) चोख बंदोबस्तात रिफायनरीचे ड्रोन सर्वेक्षण व माती परीक्षण केले जाईल.

या भागातील प्रस्तावित पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव या गावांमध्ये २२ एप्रिल ते १ मे या कालावधीसाठी कलम १४४ लागू केले आहे. त्यानुसार काही जणांना अटकही करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात बारसू रिफायनरीचा वाद पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT