Uddhav Thackeray - Shivsena  Sarkarnama
कोकण

Konkan Politics : रत्नागिरीत ठाकरेंना मोठा धक्का बसणार? 'हा' बडा नेता भाजपच्या वाटेवर

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri News : माजी मंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात निमंत्रण न दिल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे गटाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे नाराज असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. तसेच त्यांना पक्षात डावलले जात असल्याचेही बोलले जात आहे. पण आता या सगळ्या पडद्यामागील नाट्यमय घडामोडींमुळे होत असतानाच दळवी यांच्याकडून भाजप प्रवेशासाठी प्रदेश पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे एकेकाळचे शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे सध्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात नाराज असल्याची माहित मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सूर्यकांत दळवी काही पदाधिकाऱ्यांसमवेत भाजपाचा झेंडा खांद्यावर घेण्याच्या विचारात असल्याची चर्चा सध्या दापोलीत सुरू आहे.

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम(Ramdas Kadam) व आमदार योगेश कदम यांच्याविरोधातील आघाडीचे नेतृत्व त्यांनी केले आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या दापोली व मंडनगड नगरपंचायत निवडणुकीत तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांना आमदार योगेश कदम यांना शह देण्याच्या राजकारणात साथ देत महत्वाची भूमिका बजावली होती.

इतकेच नाही तर 25 वर्षे आमदार राहिल्यानंतर ज्यांच्याकडून पराभव पत्करावा लागला, त्या माजी आमदार संजय कदम यांच्याशीही जुळवून घेत रामदास कदम व योगेश कदम यांना विरोध केला. पण अलिकडे आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौर्‍यात ज्येष्ठ असलेल्या सूर्यकांत दळवी यांना साईड ट्रॅक करत आदित्य ठाकरे यांच्याकडून संजय कदम यांचा भावी आमदार असा उल्लेख करत त्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी आदित्य ठाकरे यांनी जाहीर केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, 30 डिसेंबर रोजी कोकणातील बांधकाम क्षेत्रातला मोठा नाव असलेल्या फाटक डेव्हलपर्सचे व रत्नागिरी जिल्ह्यातील मोठी श्रीमंत ग्रामपंचायत असलेल्या जालगावचे सरपंच अक्षय फाटक हे मुंबई प्रदेश कार्यालयात चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्तेसह प्रवेश करणार आहेत. फाटक यांनी भाजपाचे विद्यमान जिल्हा सचिटणीस श्रीराम इदाते त्यांच्या विरोधात ग्रामपंचायत निवडणूक लढवून त्यांचा सहज पराभव केला होता त्यामुळे या पक्षप्रवेशाला महत्त्व आहे. या दिवशीच हा पक्षप्रवेश मुंबईत होतो का याकडेही अनेकांचे लक्ष आहे.

दरम्यान दळवींच्या अपेक्षा भाजप (BJP) नेतृत्वाने मान्य केल्यास हा पक्षप्रवेश होऊ शकतो अशी माहिती मिळत आहे. विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्यासाठी दळवी व त्यांच्या सहकारी निकटवर्तींकडून तसा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. दळवी हे गेले काही महिने तसे सक्रिय राजकारणापासून अलिप्त आहेत. त्यामुळे त्यांना विधानपरिषद देऊन भाजपाला नेमका कोणता फायदा होईल याचाही विचार भाजपाकडून सुरू असल्याची चर्चा आहे. दळवींना थेट तशी संधी दिल्यास भाजपचे निष्ठावान असलेल्या नेत्यांची व युवा कार्यकर्त्यांची नाराजी ओढवू शकते.

आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपला आपल संघटन मजबूत करायच आहे. शिवसेना भाजप व अजितदादांची राष्ट्रवादी अशी सध्या महायुती आहे. सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) व रामदास कदम यांचे विळ्या- भोपळ्याचे असलेले सख्य पाहता दळवींचा भाजप पक्षप्रवेश हा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेतील कदम यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT