Ration Card Sarkarnama
महाराष्ट्र

Ration Card: राज्य सरकारचा सर्वात मोठा 'डिजिटल स्ट्राईक'; आत्तापर्यंत 18 लाख रेशनधारक ठरले 'अपात्र'; 31 मेपर्यंत संख्या वाढणार

Maharashtra Government : राज्य सरकारने ‘मेरा केवायसी ॲप’ची निर्मिती केली असून हे ॲप लाभधारकांसाठी कार्यरत केलं आहे. या ॲपद्वारे लाभार्थी धान्य दुकानात न जाता काही मिनिटांत स्वत:ची आणि सहकुटुंबाची ‘ई-केवायसी’ पूर्ण करू शकणार आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : सरकार दरबारी सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणून रेशनकार्ड ग्राह्य धरले जाते. पण अन्न व नागरी पुरवठा विभागानं आता शिधापत्रिकाधारकांपैकी अपात्र असलेल्या कुटुंबियांचा शोध घेण्याची मोहीम राबवली आहे. ही मोहीम येत्या ३१ मे पर्यंत सुरूच राहणार आहे. मात्र, आता मोहिमेतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागानं केलेल्या डिजिटल स्ट्राईकनं बोगस रेशन कार्ड (Ration Card) धारकांचे धाबे दणाणले आहे. राज्यात सुमारे 18 लाख रेशनकार्ड रद्द करण्यात आले आहेत. तसेच या मोहिमेत अजून दीड कोटीहून अधिक रेशनकार्डधारकांची ई-केवायसी होणं बाकी आहे.

महाराष्ट्रात सर्वत्र सध्या रेशनकार्ड ई-केवायसी मोहिम सुरू आहे. शिधापत्रिकाधारकांना रहिवाशांचा पुरावा देणे बंधनकारक असून तो न दिल्यास संबंधित कुटुंबियांची शिधापत्रिका अपात्र किंवा रद्द करण्यात येणार आहे. याबाबत थेट राज्य सरकारनेच आदेश दिले आहेत.

केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनांचा लाभ रेशनधारकांना मिळत असतो. त्यात केंद्र सरकारकडून मोफत धान्य वाटप,तसेच राज्य सरकारकडून आनंदाचा शिधाही रेशनकार्ड धारकांना वितरित केला जात आहे. पण यासाठी अंत्योदय, केशरी आणि पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांचे प्रकार ठरविण्यात आले आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे आधार लिंकसाठी सरकारच्या ई-केवायसी मोहिमेत राज्यातील 17.95 लाख रेशन कार्ड रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. यात मुंबईत (Mumbai) सर्वाधिक रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत. मुंबईतील अपात्र झालेल्या शिधापत्रिकाधारकांची संख्या 4.80 लाख तर ठाण्यात 1.35 लाख आहे.

त्यात राज्यातील एकूण 6.85 कोटी कार्डपैकी 5.20 कोटींचे ई-केवायसी पूर्ण झाले आहेत.तसेच 1.65 कोटी रेशनकार्ड धारकांची केवायसी अजूनही प्रलंबित असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्य सरकारने ‘मेरा केवायसी ॲप’ची निर्मिती केली असून हे ॲप लाभधारकांसाठी कार्यरत केलं आहे. या ॲपद्वारे लाभार्थी धान्य दुकानात न जाता काही मिनिटांत स्वत:ची आणि सहकुटुंबाची ‘ई-केवायसी’ पूर्ण करू शकणार आहे. सर्व रेशनधारकांना घरबसल्या सोप्या पद्धतीने लाभ मिळावा. यामध्ये फेस ऑथेंटिकेशन या तंत्रज्ञानाद्वारे झटपट पडताळणी होणार.रेशन दुकानदारासह, इतर लाभार्थी ई-केवायसी करू शकणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT