Harshvardhan Sapkal-Sharad Pawar-Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra MLC election : शरद पवारांच्या निर्णयानंतर काँग्रेसमध्ये असंतोष; बड्या नेत्यांच्या नाराजीचा स्फोट : थेट आघाडीतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव?

Mahavikas Aghadi setback News : उमेदवारांच्या माघारीमुळे महाविकास आघाडीवर मोठी नामुष्की ओढवली आहे. एकीकडे माघार घेणाऱ्या उमेदवारांची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने व काँग्रेसने हकालपट्टी करीत कारवाई केली आहे.

सरकारनामा ब्युरो

Pune News : राज्यातील विधानपरिषदेच्या 17 पैकी 6 जागावरील निवडणुका बिनविरोध करीत महायुतीने जोरदार आघाडी घेतली आहे. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या जवळपास अधिकृत दहा उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर निवडणूक होत असलेल्या ११ पैकी चार जागांवर अपक्ष उमेदवारांना पाठींबा देऊन निवडणूक रिंगणात उतरावे लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या गोटात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावरून महाविकास आघाडीत मोठे नाराजीनाट्य सुरू आहे.

उमेदवारांच्या माघारीमुळे महाविकास आघाडीवर मोठी नामुष्की ओढवली आहे. एकीकडे माघार घेणाऱ्या उमेदवारांची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने व काँग्रेसने हकालपट्टी करीत कारवाई केली आहे. तर दुसरीकडे पुण्यातील माघारीमुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी मविआतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे दिला असल्याचे समजते.

राज्यातील 17 जागेसाठी विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. गुरुवारी महाविकास आघाडीच्या गोटात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यामुळे मविआत (MVA) नाराजीनाट्य सुरू आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली, त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसला आहे.

गुरुवारी विधान परिषदेच्या रिंगणातून माघार घेतल्याने ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधूदुर्ग, यवतमाळ, वर्धा, पुणे व अहिल्यानगर या सहा मतदारसंघात बिनविरोध निवडणूक पार पडली आहे. या सहा मतदारसंघासोबतच नाशिक, सोलापूर, छत्रपती-संभाजीनगर-जालना, भंडारा-गोंदिया या चार विधानपरिषदेच्या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार नाही. मात्र याठिकाणी अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने येत्या काळात लढत होणार आहे. १७ पैकी जवळपास १० उमेदवाराने निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने मोठी नामुष्की ओढवली आहे.

दरम्यान, ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवारावर महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून कारवाई करण्यात आली आहे, त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतरही महाविकास आघाडीत नाराजी नाट्य रंगले आहे. त्यातूनच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे ऐन निवडणूक काळातच वातावरण तापले आहे. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीच्या एकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत पुण्यातील राष्ट्रवादी (NCP) शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे. पुण्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतल्यानंतर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यात तर काँग्रेसच्या नेत्याने मविआतून बाहेर पडण्याचा वरिष्ठांकडे प्रस्ताव दिल्याचे समजते.

दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नुकसान झाल्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी म्हटले आहे. ही माघार घेत असताना महाविकास आघाडीतील घटक पक्षासोबत चर्चा केली नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या सर्व आरोपामुळे आता महाविकास आघाडीमधील वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT