Mumbai News : राज्यसभेच्या राज्यातील रिक्त होत असलेल्या सात जागेसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील वातावरण निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा तापण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विधानसभेची पक्षीय बलाबल पाहता महायुतीच्या सात पैकी सहा जागा निवडून येतील असे स्पष्ट आहे. तर दुसरीकडे महाविकास आघडीच्या वाट्याला एकच जागा येण्याची शक्यता आहे. त्या एका जागेवरूनच आता मविआतील मित्रपक्ष काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चुरस आहे.
एकीकडे उद्धव ठाकरेंच्या सेनेने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी ही जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे मात्र, काँग्रेसने राज्यसभा अथवा आगामी काळात होत असलेल्या विधान परिषदेची एका जागा मागितली आहे. त्यामुळे मित्रपक्षांची कोंडी झाली आहे.
राज्यसभेच्या सात जागांसाठी राज्यात मोठी चुरस आहे. येत्या 26 फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास सुरवात होईल. त्यानंतर या निवडणुकीसाठीचे चित्र स्पष्ट होणार आहे. महायुतीचे 232 आमदार आणि अपक्षांच्या मदतीने जास्तीत जास्त राज्यसभेचे 6 उमेदवार निवडून येतील. एक खासदार निवडून येण्यासाठी ३७ मतांची गरज आहे. त्यामुळे भाजपच्या (BJP) चार जागा निवडून येथील त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची एक जागा निवडून येऊन राहिलेले उर्वरित मतदान मिळणार आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊन काही मते शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे महायुतीमधील मित्रपक्षात कोणत्याच कुरबुरी नाहीत.
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला एका जागा येणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 10, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 20 आणि काँग्रेसचे 16 आमदार असे एकत्रित 46 संख्याबळ आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा फक्त 1 उमेदवार निवडून येऊ शकतो.
राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीत (MVA) रस्सीखेच असून या एका राज्यसभेच्या जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने राज्यसभा उमेदवारीवरून वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. रोटेशननुसार राज्यसभेची जागा ठाकरे यांच्या सेनेची असल्याचा दावा करत आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी मात्र शरद पवार यांच्या नावालाच प्राधान्य दिले आहे.
त्यातच आता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोठी मागणी केली आहे. राज्यसभा अथवा विधानपरिषदेची एक जागा काँग्रेसला सोडा अशी मागणी त्यांनी केली आहे. मे महिन्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यावेळी एखादी जागा पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. दुसरीकडे राज्यसभेची जागा शरद पवार यांना देऊन त्या बदल्यात मी महिन्यात होत असलेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जागा सेफरित्या काढून घेण्याचा ठाकरे सेनेचा प्रयत्न दिसत आहे. अशावेळी काँग्रेसच्या पदरात काहीच पडणार नसल्याने लोंढे यांनी ही मागणी केल्याचे दिसत आहे. एकंदरीतच लोंढे यांच्या मागणीने महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.