Mumbai News : महायुती सरकार सत्तेत आल्यापासून एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सुरूझालेला संघर्ष थांबायचं नाव घेताना दिसून येत नाही. निधीवाटपावरुन सुरु असलेला हा संघर्ष दिवसेंदिवस हा संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा याचा प्रत्यय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पाहायला मिळाला. शिवसेना मंत्र्यांसोबत झालेल्या या विशेष बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अजित पवार यांच्याकडे असलेल्या अर्थखात्यावरुन महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची मंगळवारी (ता.24) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शक्तिपीठ महामार्गासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही शिवसेना मंत्र्यांची वेगळी बैठक झाली. या बैठकीत शिंदेंनी मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
मात्र, शिवसेनेच्या या बैठकीत सर्व मंत्र्यांनी अजित पवारांविरोधातील (Ajit Pawar) तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती आहे. यावेळी शिंदेंनी नाराजीचा सूर आळवलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना महत्त्वाचे आदेश दिल्याचं बोललं जात आहे. यामुळे अजितदादांच्या खात्यावर शिवसेना मंत्री वॉच ठेवणार आहे.
एकनाथ शिंदेंनी आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांच्या खात्याकडे 14-14 हजारांचे दोन मोठे निधी असून त्यावर लक्ष ठेवा.तो निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या,अशा सूचना दिल्याची चर्चा आहे.
निधी वाटपाच्या मुद्द्यावरून मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांची भेट घेतली. त्या आधी शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांनीही अजित पवारांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये निधीवाटपावरुन चर्चा झाल्याची माहिती आहे.
मविआ सरकारमध्ये अजित पवार निधी देत नसल्याच्या तक्रारी शिवसेना मंत्री आणि आमदारांनी केल्या होत्या. याच कारणामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी बंड केले होतं. आता पुन्हा एकदा तोच नाराजीचा सूर महायुती सरकारमध्येही आळवला आहे. यावरुन शिवसेनेची नाराजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेच्या मंत्र्यांना खडेबोल सुनावले होते. मी काय खिशात पैसे घेऊन बसतो का? अशा शब्दांत अजित पवारांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलं आहे.
कधी कधी काही बातम्या येतात की, अजित पवार पैसे सोडत नाहीत. पैसे सोडत नाही, मग मी काय खिशात पैसे घेऊन बसतोय का? शेवटी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत आम्ही 20 टक्के पैसे सोडतो, दुसऱ्या तीन महिन्यांत 40 टक्के सोडतो. तिसऱ्या तीन महिन्यांत 60 टक्के सोडतो, नंतर 80 टक्के आणि शेवटी 100 टक्के सोडतो. अशा प्रकारचं ते नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
तसेच समाजकल्याण विभागाचा निधी वळवल्याचा आरोप करण्यात येतो. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत त्या विभागाला जास्त निधी दिला आहे. काहीजण मुद्दामहून आपलं सरकार आल्यापासून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
काहीजणांनी विधानं केले की सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला.आता या ठिकाणी नरहळी झिरवाळ आहेत. तसेच सर्वांना माहिती आहे की या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत असताना आदिवासी विभागाला आपण निधी वाढवून 41 टक्के दिला आहे.पण ही माहिती समोर येत नसल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं होतं.
याअगोदरही अजित पवार आपल्याला निधी देत नाही अशी तक्रार करत शिवसेनेच्या मंत्र्यांनी या आधीही नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतल्याचं दिसून आलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.