शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेल्या काही महिन्यापासून अनेक महत्त्वाची पदं रिक्त आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाने अंबादास दानवे यांना पुन्हा संधी दिली आणि ते बिनविरोध आमदार झाले. आगामी काळात पक्षाची नव्याने बांधणी करावी लागणार आहे. परंतू यात जिल्ह्यातील दोन जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख आणि सहा उपजिल्हाप्रमुख अशी पदं रिक्त असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा जिल्ह्यातील नेते कधी सोडवणार? असा प्रश्न आहे.
महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाचा जिल्ह्यात मर्यादित यश मिळाले. महापालिकेत या पक्षाचे सहा नगरसेवक, तर जिल्हा परिषदेत नऊ सदस्य निवडून आले आहेत. 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेने संघटनात्मक बांधणीवर मोठा जोर दिला आहे. त्याच पद्धतीने ठाकरेंच्या पक्षालाही रिक्त पदे भरत नव्याने पक्ष बांधणीवर भर द्यावा लागणार आहे.
जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला विधानसभा, लोकसभा आणि त्यानंतर पार पडलेल्या महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत बड्या पदाधिकाऱ्यांनी 'जय महाराष्ट्र' केला. त्यानंतर रिक्त झालेली प्रमुख पदे भरण्यास पक्षाला मुहूर्त मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शहरातील पक्ष संघटनेचा कणा समजली जाणारी दोन जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख आणि सहा उपजिल्हाप्रमुख अशी महत्त्वाची पदे सध्या रिक्त आहेत.
निवडणुकींच्या काळात या पदांवरील नेत्यांनी पक्षांतर केल्याने संघटनेत मोठी पोकळी निर्माण झाली. निवडणुका संपल्यानंतर पक्ष पुन्हा नव्याने उभारी घेईल आणि या पदांवर निष्ठावंतांची वर्णी लागेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र, नव्या नियुक्त्या रखडल्याने पक्ष नेतृत्वहीन अवस्थेत असल्याचे चित्र दिसत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही गळती पक्षासाठी मोठी डोकेदुखी ठरली. अनेक प्रभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी अधिकृत जिल्हाप्रमुख किंवा महानगरप्रमुख नसल्याने प्रचाराच्या नियोजनात अडचणी आल्या. पक्षात राहिलेले निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी आता नव्या नेतृत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. आगामी राजकीय समीकरणे पाहता, संघटनात्मक बांधणीसाठी ही पदे तत्काळ भरणे आवश्यक आहे.
मात्र, मातोश्रीवरून अद्याप कोणतीही हालचाल होत नसल्याने पक्षात 'सन्नाटा' आहे. या रिक्तपदांवर कोणाची वर्णी लागते की ही गळती अशीच सुरू राहते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पक्षातील संघटनात्मक रिक्त पदे लवकरच भरली जातील. त्यासाठी पक्षाची समिती तयार केली जात आहे. या समितीचे दौरे होतील. त्यानंतर रिक्त पदांवर निष्ठावंतांची वर्णी लागेल, असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केले आहे.