Assembly Session : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टर्म संपत असल्याने त्यांना या सभागृहातून आपण निरोप देत आहोत. ते पुन्हा या किंवा खालच्या सभागृहात त्यांना संधी मिळेल तिथे येतील. जिद्द, चिकाटी, संघटन कौशल्य आणि अभ्यासू वृत्ती हे त्यांचे गुण वाखाणण्याजोगे आहेत. मुळात ते भाजपच्या मुशीत तयार झालेले असल्यामुळे हे गुण त्यांच्या उतरले आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात जोरदार टोलेबाजी केली. अंबादास दानवे हे पंधरा वर्ष भाजपमध्ये होते, हे देखील फडणवीस यांनी आवर्जून सांगितले.
अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणून 29 आॅगस्ट रोजी मुदत संपत आहे. त्यामुळे हे अधिवेशन त्यांचे शेवटचे असणार आहे. त्यामुळे आज सभागृहाच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवे यांचे कौतुक करतांना चांगलीच फटकेबाजी केली. भाषणाच्या सुरवातीलाच अंबादास दानवे यांचा जन्म 22 जुलै 1970 चा असल्याचा उल्लेख करत तुम्ही माझ्यापेक्षा सहा महिन्यांनी लहान आहात. राहुल गांधी जोपर्यंत युवानेते आहेत तोपर्यंत आपणही तरुणच राहू, तुम्ही चिर युवा आहात, अशी मिश्किल टप्पणी फडणवीस यांनी केली.
सहा महिन्यांनी लहान असले तरी ते माझ्यापेक्षा करामती आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या अजबनगरचे ते रहिवासी आहेत. ते मुळ आमच्या भाजपचे आहेत, त्याचं संगळ राजकीय जीवन भाजपमध्ये सुरू झालं. याच पक्षात असताना युवामोर्चात त्यांनी काम केलं. प्रभावी नेते म्हणून ते काम करत होते, पण पक्षातील वादामुळे पक्षानी त्यांना सोडलं. तेव्हाचा आमचा मित्रपक्ष असलेल्या आणि आता बदल झालेल्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. (Devendra Fadnavis) त्यांचं संपूर्ण राजकीय जीवन भाजपमध्ये घडलं. नंतर शिवसेनेत त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम केलं. मुळात त्यांनी पत्रकारीता क्षेत्रात पीएचडी केली त्यामुळे ते पत्रकार होतील असे वाटले होते. पण ते बातम्या निर्माण करणारे, पुरवणारे झाले.
पंधरा वर्ष भाजपात..
राजकीय क्षेत्रात आपल्याला पत्रकार आणि वकील अधिक पहायला मिळतात. एका चांगल्या पत्रकाराला आपण मुकलो, पण एक चांगला नेता सभागृहाला मिळाला, असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला. भाजपच्या मुशीत तयार झाल्यामुळे चिकाटी, संघटनात्मक कौशल्य, अभ्यासू वृत्ती त्यांच्यात पहायला मिळते. पंधरा वर्ष ते भाजपमध्ये होते. नंतर शिवसेनेत उपजिल्हाप्रमुख, नगरसेवक, सभागृह नेता, जिल्हाप्रमुख, आमदार ,विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केले. 2014 मध्ये ते विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. 2019 मध्ये आम्ही एकत्र होतं त्यांना पाठिंबाही दिला आणि ते विधान परिषदेवर निवडून आले. 2022 पासून ते विरोधी पक्षनेते पदावर काम करत आहेत, असे सांगतानाच अनिल परब साहेब तुम्ही तयारी करून ठेवा, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला.
जिल्हा बँकेत संचालक असलेल्या अंबादास दानवे यांचा अनेक संस्थाशी संबंध आहे. योगशास्त्रात त्यांनी एमए केले आहे, वेगवेगळे योग ते जुळवून आणतात. संजय केनेकर यांचा विवाह योग दानवेंनीच जुळवून आणला होता याचा रंजक किस्साही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितला. संजय केनेकर यांचं सूत जुळलं होत पण घरच्यांचा विरोध असल्याने अंबादास दानवे यांनी गाडीची व्यवस्था केली आणि परभणी जिल्ह्यातील प्रिंपी देशमुख येथील जैन मंदिरात त्यांचे लग्न लावून दिले अशी आठवण फडणवीसांनी सांगितली. एका आंदोलनात जेव्हा अंबादास दानवे यांना जेल झाली आणि नंतर त्यांना बेल घ्यायची वेळ आली तेव्हा कोणी तयार होईना. शेवटी ज्यांच्या मुलाला पळवून नेऊन संजय केनेकर यांच्याशी लग्न लावून दिले होते, त्या केनेकर यांच्या सासऱ्यांनीच त्यांची बेल घेतली याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी सांगितली.
एसटी ड्रायव्हरचा मुलगा..
प्रखर हिंदुत्ववादी, धार्मिक स्थळावरील भोंग्याविरोधात त्यांनी आक्रमक आंदोलन केले होते. आता ते असे निवेदन देऊ शकतात का? हा प्रश्न आहे. ते कट्टर सावरकर भक्तही आहेत. व्हॅलेनटाईन डे चा धांगडधिंगा त्यांना मान्य नव्हता. लग्न लावून देतील पण व्हॅलेनटाईनला विरोध केला म्हणून तीन दिवस ते जेलमध्ये राहिले. एसटी ड्रायव्हरचा मुलगा या पदापर्यंत पोहचला याचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्दगार काढत अंबादास दानवे यांनी केलेल्या अनेक अभिनव आंदोलनांच्याआठवणी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितल्या.
1988 मध्ये बारावीत ते गुणवत्ता यादीत होते. एसएससीचा पेपर फुटला म्हणून राग आला आणि त्यांनी बोर्डात जाऊन टेबलावर उड्या मारण्याचं आंदोलन केलं होतं. प्रश्न ठळकपणे समोर येईल अशा पद्धतीने त्यांनी आंदोलनं केली. वंदे मातरम सभागृहासाठी 31 आंदोलन त्यांनी केली. समाजशास्त्रात पदवी मिळवलेल्या अंबादास दानवे यांनी विधी शाखेची पदवी घेऊन तुम्ही वकीली पूर्ण करा, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिला. अंबादास दानवे कुठेही असले तरी त्यांच्या मुळ आत्मा हिंदुत्व आहे. हा विचार ते सोडणार नाहीत, त्या दिशेनेच ते काम करत राहतील. आपली मोठी कारकीर्द आहे, भविष्यात जिथे संधी मिळेल तिथे आपण यावं. लोकहितासाठी काम करावं. आपले उत्तम सहकारी म्हणून तुम्हाला कायम शुभेच्छाच असतील, असेही मुख्यमंत्री शेवटी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.