Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

BJP News: भाजप अंबादास दानवेंच्या विजयाचा रेकाॅर्ड तोडण्याच्या तयारीत ; पहिल्या पसंतीची पाचशे मत मिळवण्याची रणनीती!

BJP News, Suhas Shirsat, Ambadas Danve: विधानपरिषद निवडणुकीत सुहास शिरसाट यांना ५०० हून अधिक पहिल्या पसंतीची मते मिळवून अंबादास दानवेंचा विक्रम मोडण्याचे लक्ष्य भाजपाने ठेवले असून त्यासाठी जोरदार रणनीती आखली आहे.

Jagdish Pansare

MLC Elections: विधानपरिषदेची निवडणूक सर्वाधिक मतांनी, ती ही पहिल्या पसंतीमध्ये जिंकण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पाचशेहून अधिक पहिल्या पसंतीची मतं मिळवुन महायुतीची उमेदवार सुहास शिरसाट यांना निवडून आणण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री अतुल सावे व स्थानिक नेते कामाला लागले आहेत. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत नगरसेवकांना मार्गदर्शन करताना मतदानाची रंगीत तालीम करण्यात आली. यामध्ये महायुतीच्या उमेदवाराला ४५५ मते मिळाल्याचा दावा करण्यात आला.

शिवसेनेकडे असलेली जालना-छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपाने बळकावली असा आरोप केला जात आहे. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून मिळालेली वागणूक, हक्काची जागा गेल्याचे शल्य आणि आता जिल्हा बँकेतही शिवसेनेला दूर ठेवण्याचे सुरू असलेले प्रयत्न पाहता शिवसेनेच्या नाराजीचा फटका विधान परिषद निवडणुकीत आपल्या उमेदवाराला बसायला नको, याची काळजी स्थानिक नेते घेताना दिसत आहेत.

महायुतीकडे सुहास शिरसाट यांच्या विजयाइतके संख्याबळ असताना विरोधकांची मते फोडून भाजपाने सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेतील अंतर्गत नाराजीतून महायुतीच्या उमेदवाराला कुठल्याही प्रकारची अडचण यायला नको, अशी तयारी भाजपाने सुरू केली आहे. महायुतीकडे ४१९ मतं आहेत. उमेदवार सुहास शिरसाट यांच्यासाठी ५०० पहिल्या पसंतीच्या मतांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून, दुसऱ्या पसंतीचे मत न देण्याची रणनीती आखण्यात आली आहे.

३ डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत एकूण ६५७ मतदार होते. विजयासाठी ३२९ अधिक १ अशा एकूण ३३० मते आवश्यक होती. शिवसेना-भाजप पक्षाची युती होती. युती विरुद्ध आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत झाली आणि शिवसेनेच्या अंबादास दानवे यांनी काँग्रेसच्या बाबुराव कुलकर्णी यांचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव केला होता. अंबादास दानवे यांना तब्बल ५२४ मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या बाबुराव कुलकर्णी यांना फक्त १०६ मते मिळाली. दानवे ४१८ मतांनी जिंकले होते. आता भाजपाला अंबादास दानवे यांच्या विजयाचा रेकाॅर्ड मोडायचा आहे.

यंदाच्या निवडणुकीत एकूण ६६४ मतदार आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्ह्यातील मनपा, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती सदस्यांचा समावेश आहे. विजयासाठी ३३३ मते लागणार आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील तीन पक्षांकडे स्पष्ट बहुमत आहे. भाजप २२१ मतांसह सर्वात मोठा पक्ष, तर शिवसेना शिंदे गट १२७ मतांसह दुसऱ्या स्थानावर आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे दोन्ही जिल्ह्यातील मिळून ५३ अशी महायुतीकडे ४०१ मते आहेत.

महायुतीकडे चारशे पार मतदार असताना त्यांनी पाचशे मतांचे टार्गेट ठेवले आहे. यासाठी महाविकास आघाडीतील काही मते गळाला लागतात का? याची चाचपणी सुरू आहे. महाविकास आघाडीकडे संख्याबळ कमी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दोन्ही जिल्हे मिळून ३१, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ५४ तर काँग्रेस पक्षाचे ४१ अशी फक्त १२६ मतं आहेत.

इतर पक्षांमध्ये एमआयएम ३६ मते, वंचितची ४ मते तर जालन्यातील आठ अशी ४७ मते आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील संख्याबळाचा विचार केला तर महायुतीचे पारडे जड दिसते. पहिल्या पसंतीची मते घेऊन उमेदवार सुहास शिरसाट यांना विधान परिषदे पाठवण्याचा निर्धार भाजपाच्या नेत्यांनी बांधला आहे. त्यासाठी विरोधी पक्षाची मते फोडावी लागली तरी त्याची तयारी सुरू असल्याचे सध्या चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT