Chandrakant Khaire News Sarkarnama
मराठवाडा

Chandrakant Khaire News : `माझं राजकारण आता पाच वर्षे`, अंबादास दानवेंनी धीर धरावा..

Jagdish Pansare

Marathwada Shivsena News : लोकसभा निवडणूक लढवण्याची अंबादास दानवे यांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्याच काही चूकीचे नाही, पण मी राष्ट्रीय राजकारणात काम करतो, ते राज्यात. (Chandrakant Khaire News) माझे राजकारण आता फक्त पाच वर्ष असेल, तेव्हा लोकसभेसाठी अंबादास दानवे यांनी धीर धरावा, असा सल्ला शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.

राज्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून दानवे यांनी चांगले काम केले. त्यामुळे पक्षाची प्रतिमा उजळली. (Shivsena) राज्यात त्यांना आणखी मोठी संधी मिळेल, तेव्हा लोकसभेसाठी घाई करू नये, असा चिमटाही खैरे यांनी अंबादास दानवे यांना काढला. गेल्या दोन-तीन दिवसापासून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून (Chandrakant Khaire) खैरे-दानवे यांच्या कलगितुरा रंगला आहे.

दोघांनीही दावेदारी सांगितल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी थेट जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून त्यांचीशी चर्चा केली. योग्य उमेदवार मी ठरवेन, तुम्ही गट-तट, मतभेद बाजूला सारून कामाला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्यांना दिल्या. कुठल्याही परिस्थीत छत्रपती संभाजीनगरची जागा पुन्हा जिंकायची, असा निर्धारही या बैठकीत करण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधून खैरे- दानवे दोघांनीही दावा केल्याचे खासदार विनायक राऊत यांनीही मान्य केले. खैरे यांनी आपण आणखी पाच वर्ष राजकारणात राहू, पुढे दानवेंशिवाय लोकसभेसाठी दुसरे कोणी नाही, असे म्हणत एका दृष्टीने राजकारणातून निवृत्तीचे संकेतच दिल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या 4492 मतांनी पराभव झाला होता.

उद्धव ठाकरे यांच्यासह खैरे व जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या जिव्हारी हा पराभव लागला होता. याची परतफेड विधान सभा निवडणुकीत शिवसेनेचे जिल्ह्यातील सगळे उमेदवार विजयी करून करण्यात आली होती. मात्र राज्यातील बदल्या राजकीय घडामोडी, पक्षात पडलेली फूट आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लोकांमध्ये असलेली सहानुभूती पाहता ही जागा शिवसेना पुन्हा जिंकू शकते, असे बोलले जाते.

या पार्श्वभूमीवर खैरे यांना आणखी एक संधी मिळाली पाहिजे, असा मत प्रवाह पक्षात मोठ्या प्रमाणात आहे. खैरे यांनी लोकसभेची तयारी सुरू केली असतांना अंबादास दानवे यांच्याकडूनही उमेदवारीची इच्छा व्यक्त झाली आहे. यावरून जिल्ह्यातील शिवसेनेत असलेली अंतर्गत गटबाजी, खैरे-दानवे गट पुन्हा आमनेसामने आले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दानवे यांना टोकाचा विरोध न करता खैरे यांनी पाच वर्ष थांबण्याचा सल्ला दिला. एका अर्थाने येणारी लोकसभा निवडणूक ही आपली शेवटची असेल, त्यानंतर आपण राजकारणातून निवृत्त होऊ, असे स्पष्ट संकेतच खैरे यांनी दिले आहेत. आता दानवे खैरेंनी दिलेल्ला सबुरीचा सल्ला ऐकतात का? की उद्धव ठाकरे यांनाच यावर तोडगा काढावा लागणार हे येत्या महिनाभरातच स्पष्ट होईल.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT