Nana Patole Attacked on Devendra Fadnavis Sarkarnama
मराठवाडा

Winter session extension: मुख्यमंत्री म्हणाले विरोध नाही; हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार?

Winter session Maharashtra News : काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विदर्भावर अन्याय करू नका, अधिवेशनाचा कालावधी वाढवा, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचा विरोध नाही, असे उत्तर दिले.

Rajesh Charpe

Nagpur News : हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीवरून मोठी नाराजी आहे. विरोधकांनीही नागपूर करारानुसार सहा आठवड्याचे अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. विरोधात असतानाही भाजप हीच मागणी करीत होता. आता मुख्यमंत्री विदर्भाचे असताना हिवाळी अधिवेशन फक्त सात दिवसांचेच निश्चित करण्यात आले आहे. त्यावरून अधिवेशनाला सुरुवात होताच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विदर्भावर अन्याय करू नका, अधिवेशनाचा कालावधी वाढवा, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचा विरोध नाही, असे उत्तर दिले. यावरून अधिवेशनाचा कालावधी वाढवला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

यंदाचे अधिवेशन फक्त सात दिवसांचे राहणार आहे. ७ ते १४ असा अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यावेळी शनिवारी आणि रविवारीसुद्धा कामकाज ठेवले आहे. अधिवेशनाच्या पूर्व संध्येला काँग्रेस (Congress) विधिमंडळाचे पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री विदर्भातील असताना विदर्भावर अन्याय होत असल्याचे सांगितले.

सर्व निधी पश्चिम महाराष्ट्राला दिला जात आहे. विदर्भातील युवकांना रोजगारासाठी मुंबई, पुण्यामध्ये पलायन करावे लागत आहे. मुख्यमंत्री विदर्भाचा असताना विदर्भाला काहीच फायदा नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. राज्यात आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना भाजपचे नेते स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीची मागणी करीत होते. केंद्रात व राज्यात आमची सत्ता आल्यास विदर्भ राज्याची निर्मिती केली जाईल, असे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिले.

दहा वर्षांपासून दोन्ही ठिकाणी भाजपची (BJP) सत्ता आहे. मात्र त्यांना आता विदर्भ राज्याच्या निर्मितीचा विसर पडला असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. आम्ही आमच्या हायकमांडकडे विदर्भाच्या निर्मितीच्या मागणीचा प्रस्ताव पाठवणार असल्याचे सांगून वडेट्टीवार यांनी सात दिवसांच्या अधिवेशनावरही टीका केली.

विदर्भातील प्रश्न मार्गी लागावे, विदर्भाला न्याय मिळावा यासाठी अधिवेशन किमान तीन आठवड्यांचे घ्यावे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेत विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्न आणि चर्चेसाठी वेळ कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वस्त केले.

सोमवारी पुन्हा नाना पटोले यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच हाच मुद्दा लावून धरला. उद्धव ठाकरे सेनेचे भास्कर जाधव आणि नाना पटोले यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी करताना सभागृहाचा प्रमुख म्हणून योग्य निर्णय घेण्याचे आवाहन अध्यक्षांना केले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशन वाढवण्यास आपला विरोध नसल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT