Congress MP Ravindra Chavan  Sarkarnama
मराठवाडा

Nanded Congress : दिल्लीत नेतृत्व करणाऱ्या खासदार रविंद्र चव्हाणांकडं नांदेडचं जिल्हाध्यक्षपद! कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर

MP Ravidra Chavan: काँग्रेस पक्षाने मराठवाड्यासह महाराष्ट्रात 'सृजन संघटन' अभियान सुरु केलं आहे. यामुळं संघटनेत फेरबदल करुन नवे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होईल अशी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात उलटचं घडताना दिसत आहे.

Jagdish Pansare

MP Ravindra Chavan: काँग्रेस पक्षाने मराठवाड्यासह महाराष्ट्रात 'सृजन संघटन' अभियान सुरु केलं आहे. यामुळं संघटनेत फेरबदल करुन नवे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होईल अशी अपेक्षा होती. पण सध्या यामुळं नाराजीचाच सूर दिसायला लागला आहे. काँग्रेसच्या दिल्ली व राज्यातील नेत्यांचे विशेष लक्ष हे नांदेड जिल्ह्यावर होते. माजी मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीआधीच पक्ष सोडल्यानं नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान पक्षाच्या नेत्यांसमोर आहे.

गेली पंचवीस-तीस वर्षे नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची धुरा एकहाती अशोक चव्हाण व त्यांच्या कुटुंबाकडे होती. गल्ली ते दिल्ली सगळे निर्णय इथे चव्हाणच घ्यायचे. पक्ष सोडून अशोक चव्हाण भाजपामध्ये गेले असले तरी अजूनही त्यांचे काही समर्थक हे काँग्रेस पक्षातच आहेत. मात्र, त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर टप्प्या टप्प्याने आपल्या समर्थकाने गरजेनुसार भाजपामध्ये नेले, अजूनही काँग्रेस पक्षात त्यांचे समर्थक आहेत.

अशावेळी काँग्रेस नेत्यांनी नव्याने संघटन बांधणी करतांना कुठलीही जोखीम न स्वीकारता काळजीपूर्वक जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. यातूनच नांदेड जिल्ह्याचे खासदार असलेल्या रविंद्र चव्हाण यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे. सृजन संघटन अभियानांतर्गत काँग्रेस पक्षात बदल केले असले तरी जिल्ह्याचे नेतृत्व रविंद्र चव्हाण यांच्याकडेच देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जिल्ह्यात दोन अध्यक्ष देत काँग्रेस पक्षाने जबाबदारीचे विकेंद्रीकरण केले असले तरी दक्षिण नांदेड या महत्वाच्या भागाची जबाबदारी खासदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे ठेवली आहे. तर उत्तर नांदेडचे जिल्हाध्यक्ष म्हणून विठ्ठल पावडे यांना नियुक्त करण्यात आलं आहे. या बदलानंतर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरू झाली आहे. रविंद्र चव्हाण यांच्यावर दिल्लीत जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी असताना त्यांनी जिल्हाध्यक्ष पद का स्वीकारले?

या पदावर एखाद्या निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी का दिली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सगळी पदं एकाच व्यक्तीकडे जाणार असतील तर पक्ष कसा वाढणार? असा सवालही केला जात आहे. पक्षातील गटबाजी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील मतभेद उफाळून येऊ नये, यासाठीच प्रदेशातील नेतृत्वाने खासदार रविंद्र चव्हाण यांच्या खांद्यावर पक्षाने दुहेरी जबाबदारी टाकल्याची चर्चा आहे.

काँग्रेसचा हात जिल्ह्यात दुबळा?

2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत वसंतराव चव्हाण यांचा विजय आणि त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने पुन्हा ही जागा राखली. विधानसभेत मात्र काँग्रेस महाविकास आघाडीला हे यश टिकवता आले नाही. नांदेड जिल्ह्यात आज घडीला काँग्रेसचा एकही आमदार नाही. अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेसची अवस्था नांदेड जिल्ह्यात बिकट झाली आहे. जिल्ह्यातील 9 नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत पक्षाला तुरळक यश मिळाले. गेली अनेक वर्षे महापालिकेवर एकहाती सत्ता राखणाऱ्या काँग्रेस पक्षाला 2026 मध्ये 81 पैकी फक्त 10 जागा जिंकता आल्या आहेत.

संभाजीनगरमध्ये महिला अध्यक्षांचाही राजीनामा

दरम्यान, दुसरीकडं छत्रपती संभाजीनगरमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळाली. इथल्या शहर आणि जिल्हा काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल झाले. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीदरम्यान, जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावंकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. याचे चांगले परिणाम पक्षाला दिसून आले होते. कन्नड-खुलताबाद या दोन नगरपालिकेत नगराध्यक्षपदासह काँग्रेसने सत्ता मिळवली. त्यामुळे हा बदल पक्षाच्या फायद्याचा ठरला. पण काँग्रेसने शहराध्यक्षपदाचा नुकताच खांदेपालट केला. शेख युसूफ यांची उचलबांगडी करून अॅड. सय्यद अक्रम या जुन्याच चेहऱ्याला पसंती दर्शवण्यात आली. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले अपयश त्यांच्या गच्छंतीला कारणीभूत असल्याचे बोलले जाते. तर निरीक्षकांनी केलेल्या सर्व्हे आणि आढावा यादीमध्ये आपले नाव आघाडीवर होते, मग नव्या शहराध्यक्षांच्या निवडीसाठी निकष बदलले का? असा नाराजीचा सूर युसूफ शेख समर्थकांकडून आळवला जात आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा दीपाली मिसाळ यांनी सोमवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांनी हा राजीनामा अलका लांबा आणि संध्या सव्वालाखे यांच्याकडे पाठवला आहे. अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना अपेक्षित मानसन्मान मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सहा-सात महिन्यांपूर्वी त्यांची दुसर्‍यांदा शहर महिला काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. यापूर्वी त्यांनी सुमारे 28 महिने या पदावर त्यांनी काम केले होते.

आधीच शहर आणि जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था बिकट आहे. त्यात सृजन संघटन मोहिमेनंतर झालेल्या नव्या नियुक्त्याही वादात अडकल्या आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी अतिशय सुमार राहिली. महापालिकेत पक्षाला कसेबसे खाते उघडता आले. तर गेल्यावेळी अडीच वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद आणि सत्तेत असलेल्या काँग्रेसची गाडी 9 जागांवरच अडली. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाची ताकद अजूनही काही प्रमाणात दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT