Aurangabad Central Constituency News Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad Central Assembly Election : उद्धवसेनेचा पराभूत उमेदवार म्हणतो, ईव्हीएम मध्ये शंभर टक्के घोळ!

100% EVMs tampered with, claims Uddhav Sena's Balasaheb Thorat : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक मला भेटले, पण त्यांच्याकडून अपेक्षीत काम झाले नाही. त्यांच्या भागात माझ्या यंत्रणेतील कार्यकर्त्यांना बूथ लावावे लागले.

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत मला पक्षाकडून उशीरा उमेदवारी मिळाली. पण या कमी वेळात मी मतदार संघात बहुतांश मतदारांपर्यंत पोचला. विशेष म्हणजे महायुतीचा उमेदवार जिथे पोहचू शकला नाही, तिथे मी पोचलो. तरी या भागातून मला मतदान मिळाले नाही, असे कसे होऊ शकते? माझ्यासोबत रात्रंदिवस मतदारसंघात प्रचाराला सोबत असलेले पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भागात मला मतदान मिळाले नाही हे शक्यच नाही? मला 80 ते 82 हजार मतदानाची अपेक्षा होती.

शंभर टक्के ईव्हीएममध्ये घोळ झाला, असा आरोप औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार बाळासाहेब थोरात यांनी केला. (Shivsena) माझा पराभव ईव्हीएमने केला असा दावा करतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्षांची निवडणुकीत अपेक्षीत मदत झाली नसल्याचेही थोरात म्हणाले. विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीच्या सगळ्या जागा निवडून आल्या. शिवसेना महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही.

महाविकास आघाडीच्या दारुण झालेल्या पराभवानंतर ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. मध्य मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांनीही आपल्या पराभवाला ईव्हीएम जबाबदार असल्याचे म्हटले आहे. (Chhatrapati Sambhajinagar) ईव्हीएममध्ये नेमकी काय गडबड झाली याचा शोध आम्ही घेत आहोत, असेही थोरात म्हणाले. महाविकास आघाडी म्हणून तीन पक्षामध्ये समन्वय, मतांचे हस्तांतरण होणे गरजेचे होते, ते देखील झाले नाही. काँग्रेसकडे मोठे नेते असले तरी त्यांचे ग्राऊंडवर काम दिसले नाही.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक मला भेटले, पण त्यांच्याकडून अपेक्षीत काम झाले नाही. त्यांच्या भागात माझ्या यंत्रणेतील कार्यकर्त्यांना बूथ लावावे लागले. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निवडणुकीत फटका बसला. विधानसभा निवडणुकीतील हा अनुभव पाहता आगामी महापालिका निवडणुका आमचा पक्ष स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत असल्याचे थोरात म्हणाले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धनुष्यबाणाचा फटका बसला होता. मशाल चिन्ह माहीत नसल्याने अनेकांनी धनुष्यबाणाला मतदान केले होते. विधानसभा निवडणुकीत देखील त्याची पुनरावृत्ती झाल्याचा दावा थोरात यांनी केला. पक्षातील अंतर्गत गटबाजीचा फटका बसला का? यावर थोरात यांनी नेत्यांनी जुळवून घेतले पाहिजे, असे मत व्यक्त करत अधिक बोलणे टाळले.

ज्या पद्धतीने नेत्यांकडून प्रचारात मदत हवी होती, ती मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. माजी आमदार किशनचंद तनवाणी यांना पक्षाने उमेदवारी दिली, पण हिंदु मतांमध्ये फूट पडत असल्याचे कारण देत त्यांनी माघार घेतली. ऐनवेळी माघार ही पक्षविरोधी कारवाई नाही का? उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी नाहीत का? तनवाणी यांना पक्षाने एवढे मोठे केले, अनेक पदे दिली, त्यांनी ऐनवेळी माघार घेऊन गद्दारी केली, अशी टीका थोरात यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT