
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले या आघाडीच्या नेत्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. राज्यात महाविकास आघाडीसाठी पोषक वातवरण आहे, असे चित्र असताना निकाल मात्र एकतर्फी महायुतीच्या बाजूने लागले. यावरून आता ईव्हीएम मशीन वर संशय, फेर मतमोजणीची मागणी आणि बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात यासाठी सह्यांची मोहिम असे कार्यक्रम हाती घेतले जात आहेत.
मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला सहा जागा मिळाल्या. (Shivsena) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे असलेली कन्नड मतदारसंघाची जागाही शिंदेंच्या सेनेने जिंकली. या निवडणुकीत आत संभाजीनगरमधून उद्धव ठाकरे यांची शिवसेना गायब झाल्याचे चित्र आहे. इतकी वाईट परिस्थिती या पक्षाची का झाली? याला जबाबदार कोण? याची चर्चा आता होऊ लागली आहे.
औरंगाबाद पश्चिम, मध्य ग्रामीणमधील पैठण, सिल्लोड, कन्नड, वैजापूर जिल्ह्यातील नऊ पैकी सहा जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने जिंकल्या. तर पूर्व, गंगापूर आणि फुलंब्री या भाजपने राखल्या. (Uddhav Thackeray) 2019 नंतर सलग दुसऱ्यांदा जिल्ह्यात महायुतीने सर्व जागा जिंकत महाविकास आघाडीला व्हाईट वाॅश दिला. आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून सर्वाधिक यशाची अपेक्षा होती. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर सर्वाधिक आमदार या जिल्ह्यातून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते.
एकमेव कन्नडचे उदयसिंह राजपूत पक्षासोबत कायम राहिले. या निवडणुकीत ही जागाही शिंदेंच्या शिवसेनेने जिंकली. गद्दारी, पन्नास खोके या मुद्यासह उद्धव ठाकरे यांनी आपल्या जिल्ह्यातील प्रचार सभांमधून जोरदार प्रचार करत वातावरण निर्मिती केली होती. पश्चिमध्ये भाजपमधून आलेल्या राजू शिंदे यांना उमेदवारी दिली, वैजापूरमध्ये भाजपमधून आलेल्याच दिनेश परदेशी यांना ऐनवेळी उमेदवारी दिली. या दोन्ही मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिकांची नाराजी मतदानाच्या माध्यमातून समोर आली.
पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता स्थानिक नेत्यांनी मनमानी पद्धतीने घेतलेले निर्णय विधानसभेतील पराभवाला कारणीभूत ठरले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पश्चिम मतदारसंघात नाराज शिवसैनिक राजू शिंदे यांच्यासाठी पुढे आले नाही, वैजापूरमध्ये नाराज होऊन पक्षा बाहेर पडलेल्या माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी विद्यमान आमदार प्रा.रमेश बोरनारे यांना मदत केली. कन्नडमध्ये उदयसिंह राजपूत हे महायुतीच्या ताकदीपुढे कमी पडले. तिथे भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी मुलगी संजना जाधव हिला शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून देत सगळी शक्ती पणाला लावली.
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या तीनही पक्षांची ताकद एकीकडे तर दुसरीकडे उदयसिंह राजपूत एकाकी पडल्याचे चित्र होते. कन्नड मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच सुरू केली होती. उदयसिंह राजपूत एकटे पडल्याचे चित्र या संपुर्ण निवडणुक काळात दिसले. सिल्लोडमध्ये सुरेश बनकर यांनी सत्तार यांना शेवटपर्यंत झुंजवले, पण निकाल त्यांच्याच बाजूने लागला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला गर्दी जमली, लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला पण प्रत्यक्षात मतदानही झाले. पण नेहमीप्रमाणे अब्दुल सत्तार यांनी शेवटच्या टप्प्यात घेतलेल्या विशेष मेहनतीने काठावरचा विजय मिळवला.
खैरे-दानवे वादाचाही फटका
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील उमेदवारी वाटपापासून तर सगळ्या महत्वाच्या निर्णयात शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांचे वर्चस्व दिसून आले. पश्चिम मधून राजू शिंदे, पैठणमध्ये दिनेश परदेशी आणि सिल्लोडमध्ये सुरेश बनकर यांना शिवसेनेत आणून उमेदवारी देण्यात दानवे यांची महत्वाची भूमिका होती. हे तिघे निवडून आले असते तर सहाजिकच त्याचे श्रेय अंबादास दानवे यांनाच मिळाले असते. त्यामुळे त्यांच्या पराभवाची जबाबदारी देखील त्यांनाच घ्यावी लागले.
या निवडणुकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची भूमिका केवळ बघ्याची राहिली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सभांमध्ये व्यासपीठावर दिसणारे खैरे शहरी भागात प्रचार करतांना दिसले नाही. कन्नड, सिल्लोडमध्ये थोडाफार प्रचार करताना खैरे दिसले. खैरे-दानवे यांच्यातील वाद हा नवा नाही. दोन लोकसभा आणि आता विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही या दोन नेत्यांमधील वाद मिटतांना दिसत नाहीये. याचा फटका शिवसेनेला बसताना दिसतो आहे.
विधानसभा निवडणुकीत संभाजीनगरच्या बालेकिल्ल्यात झालेली नाचक्की पाहता येणाऱ्या काळात संघटनेत मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाकडून संधी दिली जाईल, नवे नेतृत्व तयार करण्याच्या दृष्टीने सध्याच्या नेत्यांना उद्धव ठाकरे काही कानपिचक्या देतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.