AIMIM News : केंद्रात व राज्यात भाजप महायुतीचे सरकार आल्यापासून शहरांची नावे बदलण्याचा सपाटा सुरू आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर झाले, उस्मानाबादचे धाराशिव झाले, अहमदनगरचे अहिल्यानगर झाले. पण नामांतराचे हे सत्र काही थांबत नाहीये. औरंगजेब कबरीचा वाद सुरु झाला आणि आता खुलताबादचे नाव रत्नपूर करण्याची नवी मागणी समोर आली. यावर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. भाजपाने आता आपल्या बापाचे नाव बदलावे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
भाजपाचे नवनिर्वाचित आमदार संजय केनेकर यांनी औरंगजेबाची (Aurangzeb) कबर प्रत्यक्ष उखडण्यापेक्षा ती लोकांच्या मनातून उखडली पाहिजे. त्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादमध्ये उभारले जावे. एवढेच नाही तर खुलताबादचे नाव रत्नपूर करावे, अशी मागणी केनेकर यांनी केली. त्याला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दुजोरा देत जे जे बाद आहे, ते आम्हाला बाद करायचे आहे, असे म्हटले. यानंतर इम्तियाज जलील यांनी भाजपावर चांगलेच तोंड सुख घेतले.
भाजपाच्या नेत्यांना आता काही काम राहिलेले नाही. (Imtiaz Jaleel) विकासाचे सगळे प्रश्न सुटले आहेत, शेतकरी, तरुण, कामगार, महिलांचे कुठलेच पक्ष शिल्लक नाहीत, म्हणून यांना गावांची, शहरांची नावं बदलायची आहेत का? औरंगाबादचे नाव संभाजीनगर, अहमदनगरचे अहिल्यानगर, चिकलठाणा विमानतळाचे नाव बदलले, उस्मानाबादचेही धाराशिव झाले. पण यावरही यांचे समाधान होत नाहीये. आता खुलताबादचे रत्नपूर अस नामकरण करण्याची मागणी हे लोक करत आहेत.
खरतंर त्यांनी आता भाजपाच्या बापाचेच नाव बदलले पाहिजे, असा टोला भाजपासह सत्ताधारी शिवसेनेला लगावला. शहरांच्या नावाला एक जूना इतिहास आहे, तो मिटवण्यापेक्षा नवे शहर उभारून त्याला महापुरूषांची नावे द्यावी, असा सल्ला इम्तियाज जलील यांनी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यापुर्वीच दिला होता. परंतु राज्यातील महाविकास आघाडी आणि त्यानंतर सत्तेवर आलेल्या महायुतीच्या सरकारने औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद या शहरांची नावे बदलली.
या निर्णयाच्या विरोधात अनेक मुस्लिम संघटना कोर्टात गेल्या होत्या, मात्र निकाल त्यांच्याविरोधात गेला. त्यांनीही आता नवी नावे स्वीकारली आहे. असे असतांना औरंगजेबाची कबर काढून टाका, या नव्या मागणीने राज्यातील वातावरण तापले. त्यातच औरंगजेबची कबर असलेल्या खुलताबादचे नाव रत्नपूर करा, अशी मागणी भाजपाच्या आमदाराने केली. यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जसे औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केले होते, तसेच खुलताबादचे रत्नपूर केले होते.
संभाजीनगर हे नाव जसे अधिकृत झाले, तसेच खुलताबादचे रत्नपूर व्हावे, अशी मागणी आता केली जात आहे. औरंगजेब कबरीच्या वादातून ही नवी मागणी समोर आली आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचेच महिमामंडण होईल, औरंगजेबाचे नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. नवनिर्वाचित आमदार संजय केनेकर हे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यांनीच खुलताबादचे नामकरण रत्नपूर असे करावे, अशी मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.