Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीची पंचवीस वर्ष सत्ता होती. या दरम्यान, शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक योजना आल्या आणि बासनात गेल्या. आता पुन्हा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पाणीप्रश्नाचे पाप कोणाचे? यावरून कुरघोडी सुरू झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगरकरांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संभाजीनगरमध्ये येऊन महापालिकेवर हंडा मोर्चा काढला होता. यावेळी राज्यात महायुतीची सत्ता येताच सहा महिन्यात शहराचा पाणीप्रश्न सोडवू,असा शब्द दिला होता. मात्र तीन वर्षापासून राज्यात युतीची सत्ता असूनही शहरासाठीची पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊ शकलेली नाही. शहरातील अठरापेक्षा अधिक वार्डात पंचवीस दिवसापासून पाणी आलेले नाही, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला.
महापालिका निवडणुकीपुर्वी छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीप्रश्न सुटावा असे प्रयत्न सत्ताधारी महायुतीकडून सुरू आहेत. योजनेचे काम करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने एप्रिल अखेरीस पूर्ण होईल, असे सांगितले आहे. परंतू कामाची गती पाहता, नियमित पाणीपुरवठ्यासाठी आणखी वेळ लागू शकतो, अशी परिस्थिती आहे. महापालिका निवडणुकीत हाच मुद्दा हाती घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (Shiv-Sena) सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे.
चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फसवणुकीचा आरोप करत त्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या हंडा मोर्चाची आठवण करून दिली. पाणीप्रश्नावर सलग महिनाभर आंदोलन करून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न उद्धवसेना येणाऱ्या काळात करणार आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणाचा मुद्दा निकाली निघाल्यानंतर आता पुन्हा एकदा पाणीप्रश्नच आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांना डोकेदुखी ठरणार आहे.
गुढीपाडव्या निमित्त शहरात काढण्यात येणाऱ्या शोभा यात्रेच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा जोरदार शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत आहे. या शिवाय पाणीप्रश्नाचे खापर सत्ताधारी भाजपावर फोडून जाब विचारण्यासाठी सलग आंदोलनाची तयारी देखील करण्यात आली आहे. शिवसेनेचे दोन्ही नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांचे याबाबत एकमत झाले असून लवकरच शहराचा पाणीप्रश्न पून्हा पेटणार आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.