Manoj Jarange Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange News : दहा टक्के आरक्षण स्वीकारण्यासाठी दबाव; मनोज जरांगेंनी सांगितलं मोठं कारण...

Sunil Balasaheb Dhumal

Maratha Political News : मराठा आरक्षणाच्या नावाखाली सरकारने समाजाला गाजर दिले आहे. आम्ही सगेसोयऱ्यांची मागणी केली, पण त्यांनी दुसरेच आरक्षण दिले. आता माझ्यावर ते 10 टक्के आरक्षण स्वीकारण्यासाठी दबाव आणला जात आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांनी सत्ततेतील मराठा समाजाच्या मंत्र्यांना, नेत्यांना कामाला लावले आहे. मात्र मी त्यांच्या दाबावाला बळी पडत नसल्याने मला जीवे मारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना माझा बळी हवा असेल तर मीच सागर बंगल्यावर येतो, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.

मुंबईकडे रवाना झालेल्या जरांगे पाटलांना (Manoj Jarange) भांबेरी गावात मराठा समाज बांधवानी मानवी साखळी करून रोखून धरले. तसेच आधी उपचार घ्या नंतर मुंबईला जाऊ, अशी विनंतीही पाटलांना केली. रस्ता अडवल्याने जरागेंनी तेथेच पुन्हा मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी, राज्यात भाजपची सत्ता आणण्यासाठी मराठ्यांना दिलेले 10 टक्के आरक्षण स्वीकारणे गरजेचे आहे. त्यातूनच देवेंद्र फडणवीस विविध मार्गांतून माझ्यावर 10 टक्के आरक्षण स्वीकारण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे पाटील म्हणाले, सरकारने दिलेले आरक्षण मान्य नसल्याने मराठा समाजाच्या वतीने 23 फेब्रुवारीपासून रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे राज्यात मराठा समाजा मोठा होऊन भाजपच्या सत्तेत अडसर होण्याची भीती फडणवीसांना (Devendra Fadnavis) आहे. त्यातूनच त्यांनी एसपींना आंदोलकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सदावर्तेंनी दाखल केलेल्या याचिकेच्या माध्यमातून कोर्टाने दिलेली सुनावणीची 13 मार्चची तारीख 23 फेब्रुवारी करण्यात आली. कोर्टानेही आंदोलनामुळे राज्यात कायदा व सुवस्थेची मराठा समाजावर जाबाबदारी असल्याचे म्हटले. त्यानुसार शांततेत आंदोलन झाले. तसेच 25 तारखेपासून गावागावात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

आपली आंदोलने शांततेत होत असल्याने सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आपण आरक्षण मागितले त्यांनी दिले गाजर. आपण मागितले ओबीसीतून आरक्षणाची (OBC Reservation) मागणी केली, त्यांनी दुसऱ्याचा प्रवर्गातून दिले. सगेसोयऱ्यांबाबत कुठेही वाच्यता केली नाही. दरम्यान, फडणवीसांच्या सरकारने पूर्वी 13 टक्के आरक्षण दिल्यानंतर राज्यात जल्लोष झाला होता. आता 10 टक्के मिळाले तरी राज्यात शांतता होती.

मी मात्र समाजाप्रति निष्ठावान राहून ओबीसी आरक्षणाची मागणी लावून धरली. यातूनच भाजपला सत्तेपासून दूर राहण्याची भीती आहे. परिणामी फडणवीसांनी मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले. माझ्यावर ऐनकेन मार्गाने 10 टक्के आरक्षण स्वीकारण्यासाठी दबाव आणला जात आहे. मात्र मागे हटत नसल्याने मलाच संपवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आता मीच सागर बंगल्यावर येतो, घ्या माझा बळी, असा इशाराच जरांगेंनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT