CM Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde News : सरकारमध्ये धनूभाऊंचं वजन चांगलंच वाढलं ; एका झटक्यात 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचं ठिकाणच बदललं...

सरकारनामा ब्यूरो

Beed: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने ‘शासन आपल्या दारी’हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांना सरकारी योजना आणि कागदपत्रे एकाच ठिकाणी सहज उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तो कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांच्या बीड जिल्ह्यातही हा कार्यक्रम होणार होता. मात्र, अजित पवार गटात सत्तेत सहभागी झाला आणि मुंडेंना या सरकारमध्ये कृषिमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. तसेच आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हेही मुंडेंकडे येण्याची शक्यता आहे. यावरुन सरकारमध्ये मुंडेंचं वजन चांगलंच वाढल्याची चर्चा आहे. कारण बीडला होणारा 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम आता परळीत होणार आहे.

बीड(Beed)ऐवजी 'शासन आपल्या दारी' उपक्रम आता परळीला होणार असल्याचे निश्चित झाले आहे. शासनाच्या मना तिथे कोणाचेच चालेना अशी गत झाली आहे. प्रशासनाच्या दृष्टीने देखील कार्यक्रमाचे नियोजन करणे गैरसोयीचे झाले आहे. मात्र, प्रशासनातील अधिकाऱ्यांची अवस्था देखील ‘सांगताही येईना आणि सहनही होईना’ अशीच झाली आहे.

विशेष म्हणजे शासन आपल्या दारी उपक्रमाची जिल्ह्यातील तारीख जून महिन्यात ठरली होती. मात्र, नंतर वारंवार तारखांत बदल होत आता पुन्हा एकदा १६ सप्टेंबरला ठरलेला कार्यक्रम पुढे ढकलला आहे. येत्या २४ तारखेला हा कार्यक्रम होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्यांना विना कटकट आणि एकाच छताखाली मिळावा, या गोंडस नावाखाली सरकारने 'शासन आपल्या दारी'(Shasan Aaplya Dari) उपक्रम हाती घेतला आहे. आता सामान्यांना योजनांचा लाभ किती मिळतो, त्यासाठी काय दिव्य पेलावे लागतात हा विषय अलहिदा आहे.

सरकारमधील मंत्र्यांना लोकांसमोर जाण्यासाठी चार - दोन कोटी रुपयांची उधळण मात्र होते. पण आता योजना मिळो ना मिळो पण मिळेल या अपेक्षेने आष्टी तालुक्यातील नागरिकांना दोनशे किलोमीटरचा फेरा मारावा लागणार आहे. तसेच, बीड, पाटोदा, गेवराई, वडवणी, शिरुर कासार आदी तालुक्यांतील लोकांनाही गैरसोयीच्या असलेल्या परळीलाच खेटा मारावा लागणार आहे.

दरम्यान, सुरुवातीला हा उपक्रम बीडला व्हावा यासाठी मंत्रालय पातळीवरुन जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तगादा लावला जात होता. तर, स्थानिक पातळीवर देखील भाजप - शिवसेनेचे नेते कार्यक्रम घ्या, असे प्रशासनाला म्हणत होते. मात्र, कार्यक्रमासाठी मंडप, लाभार्थी आणण्यासाठी वाहने, जेवण आदींसाठी तीन कोटी रुपयांचा खर्च करायला प्रशासनाकडे निधीच नव्हता. अखेर जिल्हा नियोजन समिती व अन्य मार्गाने याची तजवीज करण्यात आली.

धनंजय मुंडे मंत्री झाले. त्यामुळे...

अखेर मुख्यालय आणि जिल्ह्यातील बीड वगळता अन्य १० तालुक्यांतील लाभार्थींसाठी मध्यवर्ती व सोयीचे असलेल्या बीडला हा उपक्रम घेण्याचे ठरले. परंतु, राज्यात सत्तासमिकरणे बदली आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे मंत्री झाले. त्यामुळे आता शासन आपल्या दारी उपक्रमाचे ठिकाण थेट परळी ठरले आहे. परळीचे अंतर बीडहून १०० किलोमिटर तर आष्टीहून तब्बल २०० किलोमीटरच्या घरात आहे. म्हणजे आष्टी तालुक्यातील लाभार्थींना आता २०० किलोमीटरचा फेरा मारावा लागणार आहे.

परळीत राष्ट्रवादीचा वरचष्मा असणार...

कार्यक्रमास्थळी स्टॉल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, अग्निशामक वाहन, रुग्णवाहिका, आरोग्य विभागाचे टीम, मंडपाची उभारणी, पार्किंग आदी नियोजन करताना प्रशासनाच्या देखील नाकी नऊ येणार आहेत. प्रमुख अधिकाऱ्यांचे मुख्यालय बीडला असल्याने या बाबी पाहण्यासाठी रोज जायचे यायचे म्हणजे त्याचा नियमित कामावरही परिणाम होणार आहे. तसेच, आता परळी मुख्यालय ठरल्याने या कार्यक्रमावर पूर्णत: राष्ट्रवादीचा वरचष्मा असणार असून भाजप मात्र सत्तेत असूनही दुय्यम असेल.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT