Shivsena-AIMIM News : खान पाहिजे की बाण? औरंगाबाद हवे की संभाजीनगर? या मुद्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या अनेक निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश मिळवून दिले. तर याच प्रचाराच्या विषयांना टोकाचा विरोध करत एमआयएमने आपली वोट बँक मजबूत करत महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत धडक देत आपली कामगिरी उंचावली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि लोकसभा, विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून पुन्हा उभारी घेण्यासाठी एमआयएमला नव्या मित्राची गरज भासू लागली आहे.
गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि एमआयएम (AIMIM) या दोन पक्षांमध्ये जवळीकता निर्माण होऊ लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी रमजानमध्ये इम्तियाज जलील यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तर त्याआधी इम्तियाज यांनी थेट उद्धव ठाकरे यांचीच भेट घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. महाविकास आघाडीत सहभागी झाल्यानंतर सातत्याने ठाकरेंच्या शिवसेनेवर त्यांनी हिंदुत्व सोडले, मुस्लिम मतांसाठी लाचारी सुरू केल्याचे आरोप विरोधकांकडून होत आहेत.
वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात भूमिका घेत शिवसेनेने (Shivsena) या आरोपांना हवा देण्याचे काम केले. आता महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर झाल्यानंतर ठाकरेंच्या पक्षाची एमआयएमशी असलेली जवळीक वाढू लागली आहे. सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर बेकायदेशीर मालमत्ता खेरदीचा आरोप इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. त्याची कागदपत्रे आणि पुरावे त्यांनी अंबादास दानवे यांना त्यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन सुपूर्द केले. इम्तियाज यांच्या खेळीने लावायची ती आग लावली आणि शिरसाट यांनीच उद्या उबाठा एमआयएमसोबतही युती करू शकतो, असे विधान केले.
शिरसाट यांनी केलेले हे विधान सहज घेण्यासारखे निश्चितच नाही. ठाकरेंची शिवसेना पक्ष फुटल्यामुळे महापालिका निवडणुकीत दुबळी वाटू लागली आहे. महाविकास आघाडी असली तरी शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची ताकद जेमतेम आहे. महापालिकेच्या सत्तेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला त्याचा फारसा उपयोग होणार नाही. महायुती विरोधात लढायचे असेल तर मोठी वोट बँक असलेल्या पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. हा शोध एमआयएमजवळ येऊन थांबतो. 2015 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत 25 नगरसेवक निवडून आणत एमआयएमने विरोधी पक्षाची भूमिका बजावली होती.
एमआयएमची वोट बँक मजबूत..
मुस्लिमबहुल भागात एमआयएमची ही वोट बँक आजही टिकून आहे, उलट त्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वाढच झाली आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीतील नगरसेवकांची संख्या राखत त्यात वाढ करण्याचा एमआयएमचा प्रयत्न असणार आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे मुस्लिम, दलित मतदारांचे प्राबल्य असलेल्या वार्डात त्यांना एमआयएमची मदत होऊ शकते. अर्थात शिवसेना-एमआयएम हे दोन्ही पक्ष उघडपणे एकत्र येणे दोघांच्याही हिताचे नाही. मात्र निवडणुकीत एकमेकांना छुपी मदत करत फायदा झाला तर निवडणुकीनंतर सत्तेचे गणित जुळवून आणण्यासाठी हालचाली केल्या जाऊ शकतात.
महापालिका निवडणुकीत महायुतीली टक्कर द्यायची असेल तर एमआयएम-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना छुपी युती करावी लागणार आहे. दानवे-इम्तियाज यांच्या दोनवेळा झालेल्या भेटीने तसे संकेत मिळाले आहेत. अंबादास दानवे यांची विधान परिषदेवर मोठ्या मताधिक्याने निवड झाली होती. त्यात एमआयएमचाही हातभार होता हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे ही पडद्यामागची मैत्री आगामी महापालिका निवडणुकीत रंग भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्याच्या राजकारणात सत्ताधारी विशेषतः शिवसेना शिंदेंच्या नेत्यांविरोधात एमआयएम उद्धवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षासाठी जशी मुंबई महापालिकेची सत्ता महत्वाची आहे, तशीच छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर महापालिकेची सुत्रं पक्षाला हाती ठेवावी लागतील. मग त्यासाठी कुठलीही तडजोड करावी लागली, तर ती करण्याची मानसिकता स्थानिक नेत्यांची दिसते. छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्याच्या बाबतीत अंबादास दानवे हेच प्रमुख निर्णय घेत आहेत. उद्धव ठाकरे यांचा त्यांच्यावर असलेला वाढता विश्वास महापालिका निवडणुकीतही असणार आहे. तेव्हा इम्तियाज जलील आणि अंबादास दानवे यांची भेट येणाऱ्या काळातील वेगळ्या राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.