Imtiyaz Jaleel Sarkarnama
मराठवाडा

Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलील यांना MIM अंतर्गतच विरोध; छत्रपती संभाजीनगरमध्ये चाललंय तरी काय?

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar Political News : एमआयएमचे राज्य प्रदेशाध्यक्ष तथा छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपण मुंबईतून लोकसभा लढवण्याचा प्रस्ताव पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे दिला असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली. इम्तियाज यांच्या या प्रस्तावानंतर संभाजीनगर आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे.

इम्तियाज जलील (Imtiyaaz Jaleel) यांना पक्षांतर्गत विरोध वाढला का? छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या विरोधात कोणी मोठा स्पर्धक तयार झाला आहे का? अशा अनेक चर्चा आणि शक्यतांवर बोलले जात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातून इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला धडक देत ऐतिहासिक विजय मिळवला होता.

या विजयाची चर्चा केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातही झाली. (AIMIM) एमआयएमकडूनही या विजयाचे गोडवे अजूनही गायले जातात, असे असताना इम्तियाज यांना मुंबई लोकसभा मतदारसंघ का निवडावा लागत आहे? यासंदर्भात त्यांचे समर्थक सवाल उपस्थित करत आहेत. मीरा- भाईंदर परिसरात अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी झालेल्या राड्याचा संबंध जोडत इम्तियाज जलील यांनी मुंबईमध्ये असलेल्या अल्पसंख्याक, मुस्लिम बांधवांवर होणाऱ्या अन्यायाला कोणीच वाचा फोडत नाही, असा आरोप केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अनेक मुस्लिम आमदार खासदार हे आपापल्या पक्षाच्या दबावाखाली काम करून गप्प आहेत. अशावेळी एमआयएम हा एकमेव असा पक्ष आहे, ज्याच्याकडून गोरगरीब समाज बांधवांना आशा, अपेक्षा आहेत. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मतदारसंघात लोकसभेची निवडणूक लढवताना आम्ही निवडून येऊ का? आम्हाला कोण मतदान करणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते, परंतु नशिबाने आम्हाला साथ दिली आणि मी निवडून आलो. मीरा-भाईंदरमध्ये ज्या लोकांच्या दुकानावर शिवसेना-भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी बुलडोजर फिरवला. त्यांना जाब विचारायचा असेल तर मुंबईत एमआयएमचा खासदार निवडून येणे गरजेचे आहे.

यासंदर्भात मी ओवेसी यांच्याशी प्राथमिक चर्चा केली आहे, त्यांनी निर्णय घेतल्यानंतरच याबाबत ठरवले जाईल. केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोकसभा मतदारसंघातून त्यांनी आदेश दिला तर मी लढायला तयार आहे, असेही इम्तियाज यांनी स्पष्ट केले. इम्तियाज यांनी मुंबईतून लढण्याचा ओवेसी यांना दिलेला प्रस्ताव हा पक्षांतर्गत विरोधकांच्या कारस्थानाचा एक भाग आहे का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

इम्तियाज जलील हे एमआयएमचे खासदार आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पक्षातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते एकाधिकारशाहीचा आरोप करतात. संभाजीनगर मतदारसंघात एमआयएमचे अनेक पदाधिकारी हे इम्तियाज जलील यांच्या कुठल्याच आदेशाला जुमानत नाहीत. आंदोलनात सहभागी होत नाहीत, त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टीकरण्याची कारवाईही करण्यात आली होती. पक्षात दोन गट पडल्याचीही चर्चा आणि चित्र गेल्या अनेक वर्षांमध्ये आहे.

महाराष्ट्रातील एमआयएमची संपूर्ण सूत्रे एकाच व्यक्तीच्या हाती असल्यामुळे पक्षात मोठ्या प्रमाणात खदखद वाढल्याचे बोलले जाते. ज्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाने इम्तियाज जलील यांना पहिल्याच वेळी निवडून दिल्लीत पाठवले. त्याआधी आमदार केले त्यांनाच आता हा मतदारसंघ नकोसा का झाला आहे? याची अनेक कारणे असल्याचे बोलले जाते. इम्तियाज जलील यांचा मुंबईतून लढण्याचा ओवेसींना (Asaduddin Owaisi) दिलेला प्रस्ताव हा पक्षांतर्गत विरोधातूनच देण्यात आला की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT