Karuna Sharma - Munde Sarkarnama
मराठवाडा

Karuna Sharma - Munde : करुणा शर्मांनी मंत्री धनंजय मुंडेंना डिवचलं; म्हणाल्या," स्वतःला शेतकरी पुत्र असल्याचे..."

Deepak Kulkarni

Beed News : करुणा मुंडे-शर्मा या नेहमीच चर्चेत असतात. मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी त्या सोडत नाहीत. तसेच त्या परळीतून धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचीदेखील बोलले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आता पीकविम्यासह मतदारसंघातील विकासकामांवरून मंत्री मुंडेंवर निशाणा साधला आहे.

करुणा शर्मा- मुंडे (Karuna Sharma Munde) यांनी फेसबुक लाइव्हद्वारे मंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या, गळ्यात गमछा टाकून उसतोड कामगारांचे कैवारी असल्याचे दाखवतात. स्वतःला शेतकरी पुत्र असल्याचे सांगून देखावा करतात; पण शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत माहीत आहे का? असा सवाल उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचवेळी त्यांनी बीड जिल्ह्यात खूप वाईट स्थिती आहे. महिलांसाठी शहरात शौचालय नाही. गावात खड्डे असल्याने अनेकांचे हात-पाय तुटतात. ऊसतोड कामगारांची खूप वाईट परिस्थिती आहे. असे असताना आज हे लोकं दहा ते वीस कोटींच्या गाडीत फिरत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.

" तुझे पाच वर्षे संपल्यावर विम्याची रक्कम..."

करुणा शर्मा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) जेव्हा राज्याचे कृषिमंत्री, बीडचे पालकमंत्री झाले, तेव्हापासून काही माध्यमांमध्ये त्यांनी पीकविमा मंजूर केला ही एकच बातमी सतत पाहायला मिळते. अरे पीकविमा मंजूर केला आम्हाला माहीत आहे; पण भेटणार कधी बाबा, तुझे पाच वर्षे संपल्यावर विम्याची रक्कम मिळणार का? किंवा तू घरी बसल्यावर दुसरा कोणी मंत्री झाल्यावर याचा लाभ मिळणार का?, असा खोचक सवाल करुणा शर्मा यांनी लगावला आहे.

...यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले नाही!

शर्मा म्हणाल्या, काही लोकं स्वतःवर जेसीबीतून फुल उधळून घेतात. यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले नाही. त्यामुळे हे आमदार, खासदार आणि मंत्री आपले नोकर असल्याचे जनतेने समजून घेतलं पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. (Marathwada Political News)

तसेच धनंजय मुंडे यांनी नुसत्या घोषणा करण्यापेक्षा काम करून दाखवावे. आमदार झाल्यावर एका रस्त्याचे उद्घाटन करून नारळ फोडतात. दुसऱ्या वर्षी पुन्हा त्याच रस्त्याचे नारळ फोडले जाते. असे पाच वर्षे पाच वेळा एकाच रस्त्याचे नारळ फोडूनदेखील त्याचे काम होत नाही. हे लोकं फक्त नारळच फोडतात. मात्र, विकासकामे काही होत नाहीत. आम्ही हे केलं ते केलं असे सांगून फक्त खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT