Sillod News : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज दुपारी सिल्लोडमध्ये उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. राज्यातील दोन लाख बांगलादेशीच्या बोगस जन्म प्रमाणपत्रांची चौकशी करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी मोहिम हाती घेतली आहे. या अतंर्गत त्यांनी सतरा जिल्ह्यात भेटी देऊन माहिती गोळा केल्याचा दावा केला आहे. दोन दिवसापुर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन जिल्ह्यात दहा हजार बांगलादेशी असल्याचे सांगत त्यांच्या जन्म प्रमाणपत्रांची चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली होती.
एकट्या सिल्लोड शहरात साडेचार हजाराहून अधिक बांगलादेशी असल्याचा दावा करत आज सोमय्या थेट सिल्लोडमध्ये दाखल झाले. 4735 बांगलादेशींची यादी आपण एटीएसकडे देणार आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले. या सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या जन्म प्रमाणपत्रांची फेरतपासणी,अर्जासोबत जोडलेले पुरावे तपासावे, अशी मागणीही (Kirit Soamaiya) किरीट सोमय्या यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात पंचवीस हजार बोगस मतदार असल्याची तक्रार स्थानिक भाजप नेते व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. ही सगळी नावे यादीतून वगळून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र यावर कुठलाही निर्णय झाला नाही. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे चौथ्यांदा सिल्लोडमधून निवडून आले. त्यांच्या निवडीवर शिवसेना महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार सुरेश बनकर यांनी आक्षेप नोंदवला होता.
निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्यावरही त्यावेळी गैरप्रकार केल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सिल्लोड दौरा आणि साडेचार हजाराहून अधिक बांगलादेशी शहरात राहत असल्याच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.या सगळ्यांना जन्म प्रमाण पत्रांचे वाटप करण्यात आले आहेत. कुठलाही अधिकृत पुरावा, कागदपत्रे न तपासता एकाच वर्षी म्हणजे 2024 मध्ये या जन्म प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे.
2021-22 मध्ये उशीरा जन्म प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या फक्त 50 होती. ती नंतर एका झटक्यात साडेतेराशे कशी झाली? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. उशीरा जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केलेले 98 टक्के लोक हे बोगस आणि बांगलादेशी आहेत, असा दावा सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना केला. केवळ आधार कार्ड आणि बोगस रेशनकार्डचे पुरावे जे अधिकृतपणे ग्राह्य धरता येत नाही, त्याआधारावर जन्म प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.
एसडीएम यांच्याशी झालेल्या चर्चेत संबंधित अधिकाऱ्यांनी या अर्जदारांचे कोणतेही पुरावे तपासले नाही, याची कबुली दिली आहे. तसेच या सगळ्या 4735 अर्जांची पुन्हा तपासणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे. असे असले तरी मी या सगळ्यांची यादी एटीएसकडे पाठवणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
नगर परिषद आणि तेथील सीईओ काय करत होते? असा सवाल करत सोमय्या यांनी नगर परिषदेलाही भेट दिली.पण सीईओ नसल्याने ते काही मिनिटातच तिथून निघून गेले. किरीट सोमय्या यांनी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली.तर अर्धा तास ते नगर परिषदेत होते. दोन तासांच्या सोमय्या यांच्या या दौऱ्याने सिल्लोडमधील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.