Uddhav Thackeray Eknath Shinde sarkarnama
मराठवाडा

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : "4 ते 5 खासदार ठाकरे गटात येण्यासाठी रडत आहेत, मुख्यमंत्र्यांचेही डोळे पाणावलेत"

Akshay Sabale

महायुतीत जागावाटपावरून शिंदे गट आणि भाजपत तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. भाजपनं केलेल्या विरोधामुळे भावना गवळी ( Bhavana Gawali ) आणि हेमंत पाटील ( Hemant Patil ) यांचं तिकीट कापण्यात आलं आहे, तर रामटेकमध्ये कृपाल तुमाने ( Krupal Tumane ) यांच्याऐवजी काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना शिवसेनेत घेऊन तिकीट देण्यात आलं आहे, तर नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे ( Hemant Godse ) यांचंही तिकीट कापलं जाऊ शकते. त्यांच्याऐवजी मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्या नावाची चर्चा आहे. हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांनाही भाजपनं विरोध केला आहे.

यावरून छत्रपती संभाजीनगर येथील ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांनी शिंदे गटाला डिवचलं आहे. शिवसेनेतून फुटलेल्या खासदार पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण, गद्दारी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात स्थान नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं चंद्रकांत खैरेंनी ठणकावून सांगितलं. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

चंद्रकांत खैरे म्हणाले, "13 फुटलेल्या खासदारांमधील चार ते पाच जण पुन्हा पक्षात येण्यासाठी रडत आहेत. पण, गद्दारांना पक्षात पुन्हा स्थान नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांचेही डोळे भरून आलेले दिसत आहेत. त्यामुळे कुणीही गद्दारी करू नये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातही गद्दारांना माफ करण्यात आलं नव्हतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही गद्दारांना माफ केलं नाही."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, भाजपनं शिवसेना शिंदे गटातील काही उमेदवारांना कडाडून विरोध केल्यामुळे जागावाटप रखडलं आहे. हिंगोलीतील विद्यमान खासदार हेमंत पाटलांच्या उमेदवारीला स्थानिक भाजपच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. तसेच, यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे झालेले आरोप पाहता त्यांनाही उमेदवारी देण्यास भाजपचा विरोध होता. हेमंत पाटील आणि भावना गवळी यांनी उमेदवारीसाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण, अखेर दोघांचीही तिकिटं कापण्यात आली.

हिंगोलीतून हेमंत पाटील यांच्याऐवजी शिवसेना नांदेड जिल्ह्याप्रमुख बाबूराव कदम-कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली, तर वाशीम-यवतमाळमधून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारीची लॉटरी लागली आहे.

तर हेमंत पाटील, भावना गवळींचा पत्ता कट झाल्यानंतर नाशिकचे हेमंत गोडसे आणि खासदार धैर्यशील माने यांचं काय होणार? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. धैर्यशील मानेंच्या उमेदवारीला भाजपनं विरोध केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नव्या नावाचा विचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. धैर्यशील माने यांच्या आई निवेदिता माने यांना हातकणंगलेमधून संधी देण्याची चर्चा सुरू आहे, तर हेमंत गोडसे यांचं तिकीट कापून छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT